पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चैत्र : चैत्रगौर -
 चांद्र वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र या महिन्याच्या पौर्णिमेला वा आगे मागे चित्रा नक्षत्र लागते. त्यावरून या महिन्यास चैत्र हे नाव मिळाले आहे. या महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होतो. शिशिर ऋतूत पर्णहीन झालेल्या झाडांना कोवळा मोहर फुटू लागतो. फुलझाडांचा बहर पूर्णत्वाला पोहोचतो. पृथ्वीचे 'गंधवती धरा' हे विशेषण सार्थ होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेस संवत्सरास प्रारंभ होतो. या दिवसाला महाराष्ट्रात पाडवा म्हणतात. घराघरावर गुढ्या उभारतात. या दिवशी मराठवाड्यात महाराष्ट्रात कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, गोमूत्र, हरभऱ्याची डाळ यांचा घोळाणा करतात. तो प्रसाद म्हणून घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना देते. प्रतिपदेला जो वार असेल तो शुभ मानला जातो. त्याला वर्षेश समजतात. याच दिवशी चंडिकेचे नवरात्र सुरू होते. गार पाणी भरलेले माठ पाणपोईत ठेवण्यास सुरुवात करतात. स्त्रियांचे महत्त्वाचे व्रत चैत्रगौर तृतीयेपासून सुरू होते. अशी श्रद्धा आहे की गौरी शंकरासह माहेरी येते. तिचे शंकरासह पूजन करतात. या दिवसापासून महिनाभर दोलोत्सव सुरू होतो. तृतीयेला गौरीला देव्हाऱ्यात झोक्यावर बसवितात व तिची पूजा करतात. चैत्र तृतीया ते अक्षय्यतृतीयेच्या दरम्यान सोयीनुसार घराघरांतून चैत्रातले हळदीकुंकू केले जाते. शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी हा सोहळा सजवतात. कारण देवीचे मंगळवार आणि शुक्रवार मानले आहेत. या दिवशी सवाष्णी व कुमारिकांचा हळदीकुंकू, चंदनाचा हातावर लेप लावून, पाय धुऊन, अत्तर लावून सन्मान करतात. भिजवलेल्या हरभऱ्याची ओटी भरतात. कैरी घालून केलेली आंब्याची 'डाळ व पन्हे' देतात. गौरी या काळात माहेरी येते. गौरीची सजावट लक्ष्म्यांच्या, भाद्रपद गौरीच्या सजावटीप्रमाणे देखणी असते. विविध प्रकारची फळे, लाडू, अनारसे, करंजा, चकल्या आदी पुढ्यात सजवून मांडतात, कोकणात 'गौरीचे माहेर' नावाचे गाणे म्हणण्याची प्रथा आहे. गौर मैत्रिणीबरोबर खेळून, झोके घेऊन अक्षय्यतृतीयेला परत माहेरी जाते.
 चैत्रात अंगणात एकेक कोपरा सारवून त्यावर नवनव्या रांगोळ्या घालण्याची प्रथा कोकणात अधिक आहे. त्याला चैत्रांगण म्हणतात. चैत्रांगणात गौरीची पावले, पंखा, सूर्य , चंद्र, तुळशी वृदांवन, एकमेकींचे हात धरून नाचणाऱ्या मुली इ. आकृत्या काढतात. या ठिकाणी डॉ.डी.डी. कोसंबींच्या 'मिथ अँड रिॲलिटी' या

२५४
भूमी आणि स्त्री