पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मातृसत्ताक व्यवस्था ते पुरुषसत्ताक व्यवस्था : काही दुवे -
 भारतीय एकात्मता अंगभूत आहे. रामानी उत्तर दक्षिणेला जोडले तर कृष्णाने पूर्व पश्चिमेला जोडले. संपूर्ण भारत विविध कला, भाषा-लिपी यांच्या माध्यमातून आजही आपल्या एकात्मतेचे चकित करणारे दर्शन घडवितो असे मांडणारे १६डॉ. राम मनोहर लोहिया पांचाली ऊर्फ द्रौपदीबद्दल लिहितात, 'तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी हजरजबाबी ज्ञानी भारतीय स्त्री नाही' अर्जुनासह पाचही पांडव तिच्यापुढे फिके वाटतात. द्रौपदी ही अत्यन्त बुद्धिमान, हजरजबाबी स्त्री होती.
 मातृसत्ताक जीवनपद्धतीचा विकास पाहता असे दिसते की, विवाहसंस्थेचा जो विकास झाला त्यात, मातृकुल संघातील सर्व स्त्रिया या त्या पिढीत असणाऱ्या सर्व स्त्रियांच्या पुत्रपुत्रिकांच्या माता मानल्या जात, त्यांचे पुत्र एकाच वेळी त्यांच्या कन्यांचे बंधू आणि हक्काचे पती असत. सर्व भगिनी हक्काच्या भार्या असत. यमयमीच्या कथेवरून हे आपल्या लक्षात येते. जमिनीवरचा हक्क मातेचा कुळातील महिलांना असे. ऋग्वेदातील एका कथेत बृहस्पतीने आपल्या बंधूची पत्नी ममता हिच्याकडे संभोग मागितला होता. ती गरोदर असल्याने नकार दिला. तेव्हा तिला तुझा पुत्र आंधळा होईल असा शाप दिला. मागणी करणारा व मागणीस नकार मिळताच शाप देणारा पुरुष आहे. आज जी पुरुषकेंद्री कुटुंबसंस्था आहे तिची घडण, मातृसत्ता तिचा जमिनीवरचा अधिकार, उत्पादनात स्त्रीचा असलेला सहभाग यांकडून पुरुषसत्तेच्या दडपणाखाली पुरुषसत्ताक समाजाकडे सुरू झाली. शेतीची मशागत (हातांनी) करण्यात नांगराचा वापर सुरू झाला. या समाजिक बदलांच्या काळात स्त्रीचे महत्त्व कमी व स्थान दुय्यम होत गेले असावे. शेतीच्या अवजारांना ग्रामीण भागात सणंग म्हणतात. नांगर हा पुरुषाच्या जननेंद्रियाचे प्रतीक आहे. स्त्रीलाही ग्रामीण भागात सणंग म्हणतात. ती जणु त्यांच्या मालकीची वस्तू. स्त्रीच्या दुय्यमतेच्या प्रवासातील हा एक टप्पा असावा. अत्यन्त बुद्धिमान स्त्री द्रौपदी, जी कृष्णा - सावळी आहे, ती स्पष्टवक्ती आहे, तिचे समाजातील महत्त्व कमी होत गेले असावे. सीता आणि सावित्री या पवित्र आणि सतीत्वाचा आदर्श असलेल्या स्त्रिया मानल्या जातात. उलट द्रौपदीने अर्जुनावर अधिक प्रेम केले या सबबीखाली ती प्रथम मृत होऊन पडली असे मानले जाते. कुंतीच्या कर्ण, धर्मराज,

२४४
भूमी आणि स्त्री