पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खंडोबाच्या नवरात्रात सुपात साळीचे तणीस ठेवतात. कणसे काढल्यावर खाली जो भाग उरतो त्याला तणीस म्हणतात. त्यावर बाजरीचे दिवे लावतात. तळी भरताना सुपाने तीनदा पाखडल्याची कृती करायची. करताना 'सदानंदाचा येळकोट, चांगभले' असे म्हणायचे, नवरात्राप्रमाणे मातीत बियाणे पेरून घट मांडतात. काहीच्या घरी नवी लहान चौकोनी गादी मांडतात. ४ कोपरे व मधोमध भंडारा ठेवतात आणि येळकोट म्हणत उधळतात. खंडोबाचे घट बसल्याच्या पाचव्या दिवशी नागदिवे असतात. हे दिवे पुरणाचे वा बाजरीचे असतात. सुपात प्रत्येक पुरुषाच्या नावाने नियुक्त केलेला पदार्थ आणि त्यावर दिवा असे मांडतात, घरातील विळा घेऊन त्या दिव्यावर धरतात. हे दिवे शुद्ध तुपाचेच असावेत असा संकेत आहे. त्या विळ्यावर धरलेल्या काजळीला तुपाचे बोट लावून ते काजळ प्रत्येकाच्या डोळ्यांत घालतात. बाजरीच्या उकडदिव्यांना बोने म्हणतात, कांद्यावांग्याचे भरित आणि रोडगा हा नैवेद्य कुत्र्याला वाढतात. भूमीच्या सुफलनशक्तीशी संबंधित व्रते वा सणांच्या नैवेद्यात भाज्यांना, धान्याच्या राशींना विशेष महत्त्व असते. काही घराण्यांत विवाहानंतर प्रथम जेजुरीला जातात. पतीने पत्नीला किमान पाच पावले उचलून न्यायचे असते. 'बेलभंडार' वाहणे ही मुख्य भक्ती असते. हळदीच्या पुडीत खोबऱ्याच्या वाट्या घोळसून तो प्रसाद देतात. घटाजवळ अखंड नंदादीप असतोच. ताटात खोबऱ्याचे तुकडे, हळद, दिवे, कुंकू, अक्षता ठेवून घरातील सर्व जण ते ताट एकाचवेळी उचलतात. त्याला तळी भरणे म्हणतात. ती तीन वेळा उचलून खाली ठेवतात.
 मल्लूखान मल्हारी -
 मल्हारीसाठी मल्लूखान१४ व अमजतखान ही दोन मुसलमानी नावे आली आहेत. मल्लखान नाव बीड येथे मिळालेल्या १७ व्या शतकातील एका कोरीव लेखात आहे. जैनपंथातील काहींना मल्लारी म्हणजे तीर्थंकर मल्लीनाथ असे वाटते. जेजुरीच्या मंदिरातील बाहेरच्या कोनाड्यात मल्लीनाथाचा यक्ष कपर्द याची मूर्ती आहे. तिच्याखाली संवत् १३०३ (श. ११६८ इ.स. १२४६) चा उल्लेख असून धल्लक नावाच्या भक्ताने ती मूर्ती बसविल्याचा उल्लेख आहे.
 खंडोबाच्या जवळ कुत्रे असते. घोडा-अश्व असतो. अश्व सूर्याचे प्रतीक, नंदी

२४०
भूमी आणि स्त्री