पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून ती निघून गेली. सूर्य तिला शोधायला निघाला. ती त्याला घोडीच्या स्वरूपात दिसली. सूर्याने अश्वरूप घेऊन तिच्या नाकपुडीतून संभोग केला. त्यातून आश्विनीकुमार पुत्र झाले. (हरिवंश ब. ९)
 २. त्वष्ट्याने सूर्याला रंध्याने घासून स्वच्छ केले. सुंदर केले पण पाय तेवढे घासायचे राहिले. त्यामुळे तो लंगडा राहिला. सूर्य लंगडा असल्याचा उल्लेख ऋग्वेदात मिळतो. (१.२४.८) (भविष्य पु. ब्राह्मपूर्व ७९.८४) त्यावरून वरील कथा तयार झाली असावी. संपूर्ण सूर्यपरिवार लंगडा आहे. शनी, अरुण, यम इ.
 सूर्यबिंबाचे संकेत -
 प्राचीन वाङ्मयात सूर्य हा एक पक्षी आहे. तो आकाशाच्या या सीमेपासून त्या सीमेपर्यंत उडतो ही कल्पना ऋग्वेदापासून ते पुराणापर्यंत आढळते. सूर्याचे किरण म्हणजे उडणारे पक्षी. याच कल्पनेतून पुढे सूर्यदेवता गायत्री ही पक्षिणी मानली गेली. मात्र ऋग्वेदात आणि नंतरच्या यज्ञीय परंपरेत सूर्याला वैश्विक अश्व मानले गेले. उषा पूर्वेकडून येताना सुंदर अश्व (सूर्य) घेऊन येते असे ऋग्वेदात म्हटले आहे. अश्व याचा अर्थ सर्वव्यापी. सर्वव्यापी अशा प्रकाशवृक्षाचे मूळ म्हणजे सूर्य. सूर्यबिंबात देव राहतात. ते मधाचे आगार आहे. सकाळी यज्ञात आहुती दिली तर देव किरणांतून यज्ञात येतात अशी कल्पना आहे. पुण्यशील मृतांचे आत्मे सूर्यात राहतात असे मानले जाते. त्याबाबत डॉ. स. अ. डांगे लिहितात, 'नियमन करणाऱ्या सूर्याचा आविष्कार म्हणजे यम, तो प्राणांचे नियमन करतो. त्याचे पाश म्हणजे सूर्य किरणे. यम हा सत्यवानाचे प्राण या सूर्यपाशांनी ग्रहण करतो, पण सूर्याची शक्ती असलेली सावित्री त्याला सोडवते. सावित्री सूर्याच्या अर्जनका रूपाची शक्ती होय. सूर्याची उपासना केल्यामुळे ती अश्वपतीची कन्या म्हणून भूमीवर आली असे महाभारत सांगते.
 सर्व प्राणिमात्रांना सूर्यापासून चैतन्य मिळते. पर्जन्यवृष्टी करणारा तो. अग्नीला दिलेली आहुती त्याला मिळते. त्यामुळे तो प्रसन्न होऊन वृष्टी करतो व त्यातून अन्न मिळते. अन्नामुळे प्रजा निर्माण होते असे मनुस्मृती सांगते. रविवार हा सूर्याचा वार मानतात. नागर ब्राह्मणात वधू विवाहापूर्वी ७ दिवस सूर्यपूजा करते. राजस्थानात

भूमी आणि स्त्री
२३१