पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आज गौरी जाशील ती परत कधी येशील?
पाऊस पडे गंगा भरे येईन मी भादव्यात
नारळीच्या फुलावरनं येईन थाटात

 स्त्री आणि प्राथमिक अवस्थेतील कृषिकर्म यांतील नैसर्गिक नाते, भूमीच्या सर्जनशीलतेचा सन्मान, लक्ष्म्या, गौरी यांसारख्या व्रतातून आपले आदिम आणि मनोहारी अस्तित्व दाखवते.
 नवरात्र:
 आश्विनातले नवरात्र मराठवाड्यात सर्व जातिजमातीतून साजरे होते. हा उत्सव मूलतः जमिनीच्या सुफलीकरणाशी संबंधित आहे. शेतातील माती, गोठा, तबेला, वारूळ, चौरस्ता या ठिकाणांची माती एकत्र मिसळतात. ती पत्रावळीवर गोलाकार पसरतात. त्यात सात वा नऊ प्रकारचे धान्य मिसळतात. ज्यांचे घरी शेत नाही अशांना नवरात्रात पत्रावळीवरील मातीत मिसळण्यासाठी मिसळाचे धान्य बीज म्हणून देणे शुभ मानले जाते. पूर्वी देशमुख, पाटील यांच्या घरातील प्रमुख स्त्री नवरात्रापूर्वी मिसळीचे बीजकरण एकत्र करून ठेवी. मधोमध मृत्तिकेचा कलश मांडतात. त्यात सप्तसरितांचे पाणी ठेवतात. विविध विहिरींचे पाणी ठेवतात. त्या मातीवर पाणी शिंपडतात.या कलशात विड्याची पाने आणि नारळ ठेवतात. माती व पाणी विविध ठिकाणची असावी असा संकेत आहे. विविधता एकत्र आली तर त्यातील सुफलन शक्ती वाढते अशी लोकमनाची श्रद्धा हजारो वर्षांपासून आहे. याची प्रचीती त्यातून मिळते. मृत्तिका म्हणजेच माती. ती ब्रह्मदेवाने निर्माण केली. कश्यपमुनींनी तिला अभिमंत्रित केले. हत्तीघोडे यांच्या पायाखालचा रस्ता, वारुळ, संगम, डोह, गाईचा गोठा येथील मातीला सप्तमृत्तिका म्हणतात. तिच्यात चव्हाट्यावरची माती मिसळली की ती 'अष्टमृद्' होते. माती चार प्रकारची असते. पांढरी, पिवळी, लाल व काळी. पांढरी माती घरासाठी चांगली. ती फुटत नाही व तिच्यावर अग्नीचा परिणाम होत नाही. भृगू कश्यप मुनींनी वास्तु ग्रंथात मातीचा विचार मांडला.
 मंगलकार्यासाठी सुवासिनी रानात जाऊन माती आणून चूल घालतात. तिला

२०८
भूमी आणि स्त्री