पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या स्त्रीप्रधान व्रतात गणेश आणि शिव अनुपस्थित असतात. या व्रतातून वनस्पतीसृष्टीची समृद्धी अभिप्रेत आहे. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीतून त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पदार्थातून हे जाणवते. कोल्हापूर, कोकण भागात गौरच तेरड्याची, गौरीफुलांच्या झाडांची असते. हे वनस्पतींबद्दलचे प्रेम गौरी वा लक्ष्मीच्या गाण्यांतून सतत प्रगटते.

लक्ष्मी आई आली शेता नि शिवारात
लाडक्या बाळा माझ्या पाणी तुज्या घागरीत

 शेत आणि पाणी यांतूनच लक्ष्मी.... समृद्धी फुलणार

लक्ष्मी आई आली शेताच्या बांधासाठी
सावळा बाळराजा हाती गोफण पाया पडी

 बांधासडीला उभी राहून भराला आलेल्या शेताकडे कौतुक भरल्या डोळ्यांनी पाहणारी लक्ष्मी आणि पिकांच रक्षण करण्यासाठी गोफण हाती घेऊन पाया पडणारा बाळराजा, यातून स्त्रीमनाच्या प्रतिमासृष्टीचे वैशिष्ट्य लक्षात येते.

माज्या हे गऽ शेतात
हाल्या बैलाचं आऊत
माझ्या हे गऽ घरी
लक्ष्मी येती धावत

 बैलांच औत ज्याच्या शेतात त्याच्या घरी लक्ष्मी धावतच जाणार ना ?

पाऊस पडला चिखल झाला
व्हात आली गंगा
गौराय पावनीला जेवायला
भाजी भाकरी सांगा

 शेतातील भाकरी आणि भाजी हाच खरा लक्ष्मीचा नैवेद्य. तिचे स्वागत मराठवाडा, कोकण, वऱ्हाड, पश्चिम महाराष्ट्रात भाजी भाकरीनेच होते.
 शेताची सुफलशक्ती वाढवणाऱ्या या गौरीला निरोप देतांना शेतकरी म्हणतो -

भूमी आणि स्त्री
२०७