पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भादव्यातील समृद्धी -
 आषाढात पेरलेली पिके भाद्रपदात दाण्यात भरू लागतात. उडीद मूग, मका, भात या पिकांचा बहार शिगेला पोहोचलेला असतो. चैत्रापासून ते आषाढापर्यंत शेतकरी शेतीच्या मशागतीत, पेरणीत गुंतलेला असतो. कामात आकंठ बुडालेल्या शेतकऱ्याला श्रावणात क्षणाचा विसावा मिळतो. तरीही त्याचे मन शेतात गुंतलेले असते जणु भूमी त्याच्याशी बोलते. पुढे काय पेरायचे याचा मन कौल घेत असते. आषाढात पेरलेल्या धान्याला बरकत यावी आणि भाद्रपद अखेर आणि आश्विनात पेरावयाच्या हरभरा, करडई, गहू, ज्वारी आदी बियाणांचा पेरा उत्तम व्हावा यासाठी भूमीची सुफलनशक्ती वाढावी अशी मंगलकामना या पूजेच्या पाठीशी असते. पिकांना कीड न लागता, काही अनिष्ट न घडता उत्तम पैदास व्हावी यासाठीच्या शुभेच्छा लक्ष्म्यांच्या मांडणीतून, नैवेद्यातून व्यक्त होतात. उदा. -
 १. लक्ष्म्यांचे धड म्हणून धान्याच्या कोठ्या, घागरी, डबे यांचा वापर. त्यात फराळाचे पदार्थ भरण्याचा रिवाज.
 २. लक्ष्म्यांसमोरच्या चौकात धान्याच्या राशी घालून त्या पूजतात.
 ३. लक्ष्म्यांच्या डोक्यावर भोपळा, पडवळ, केवडा, ठेवतात. भोपळा रुंदावणारा, पडवळ लाबंणारे, दोन्ही समृद्धीदर्शक. केवडा सुगंधी. धरेचा गुणधर्म सुगंध. 'गंधवती धरा' असे म्हटले जाते.
 ४. दोन वेगळे पदार्थ एकत्र आले तर वृद्धी होते ही संकल्पना प्राचीन समाजातही होती. आदल्या सायंकाळी मिसळीची भाकरी, दुसरे दिवशी खिचडी, सार हे पदार्थ नैवेद्यात असतात. या काळात भाज्या विपुल येतात. त्यातून भरपूर भाज्या करण्याची प्रथा.
 ५. ब्राह्मण समाजात अनेक घरांतून लक्ष्भ्यांच्या जेवणाच्या दिवशी दोन सवाष्णी बोलावतात. त्यातील एक शेतकरी समाजातील असते. ही भूमीची पूजा असल्याने त्या निमित्ताने शेतात श्रमणाऱ्या स्त्रीचा लक्ष्मी म्हणून सन्मान केला जातो.
 ६. सायंकाळी येणारा पाहुणा मुक्कामाला येतो. लक्ष्मी सायंकाळी येते. पुढच्या दाराने येऊन घरात थेट गोठ्यापर्यंत फिरते.

२०२
भूमी आणि स्त्री