पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वऱ्हाडातल्या महालक्ष्म्यांचे वेगळेपण -
 वऱ्हाडातही महालक्ष्म्या बसवणे हा वाक्प्रचार आहे. महालक्ष्म्यांच्या डोक्यावर १६ पदरी पोवती आणि मुलांसाठी ८ पदरी पोवती हळदीमध्ये भिजवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी महालक्ष्म्या सुतवतात. सुतवणे म्हणजे एकत्र बांधणे. महालक्ष्म्या आठआठ पदरांनी तर मुले चारचार पदरांनी सुतवतात. डाळीचे वडे, कचोरी, बोंडे असे तळणाचे सोळा प्रकार करतात. कथली म्हणजे पडवळ टाकून कढी करतात. आंबिल आणि पुरणपोळी हे मुख्य पदार्थ असतात.
 वऱ्हाडात भाद्रपद, आश्विनात गौरीची पूजा विविध प्रकारांनी होते. इनाई, भराडी गौर, भुलाबाई हे कुमारिकांचे वा नवविवाहितांचे खेळोत्सव वऱ्हाडात उत्साहाने साजरे होतात. भुलाबाईशी सारखेपणा असलेला हादगा भोंडला पश्चिम महाराष्ट्रात खेळला जातो. तर खानदेशात भुलाबाई मांडली जाते. या चारही खेळोत्सवाचा विचार स्वतंत्रपणे मांडला आहे.
 वऱ्हाडातही लक्ष्म्यांची तयारी साग्रसंगीत होते. कनिष्ठा पूर्वेकडील दारातून येते. ती विचारते मी आत येऊ? दारातील सुवासिनी तिला 'यावे यावे' असे म्हणत घरात नेतात. जणु साक्षात् लक्ष्मी म्हणते मी येऊ का ? लक्ष्मीच्या रूपाने चैतन्यच विचारते की मी येऊ का ? जणु हा चैतन्याच्या स्वागताचा सोहळा असतो. दोन्ही महालक्ष्म्या माप ओलांडून त्यांच्या जागी विराजमान होतात, रात्री या दोन्ही जगन्मातांना सुतवतात. प्रा. वामन चोरघडे यासंदर्भात नोंदवितात की पूर्वी हाताने काढलेल्या सुताने सुतवणे होई.
 स्त्रिया महालक्ष्मीसाठी सूतबिंडा करून ठेवत. कापूस पिंजून सुरेख सूत काढण्याची, त्याच्या तऱ्हेतऱ्हेने वाती करण्याची कला त्यांच्याजवळ होती. वऱ्हाडातही १६ भाज्या, १६ पक्वान्ने जेवणात नैवेद्य म्हणून करतात. पूजेसाठी १६ प्रकारची पत्री लागतात.
 गौरी वा महालक्ष्म्यांच्या सणात सोळा या आकड्याचे महत्त्व -
 या सणात १६ आकड्याला विशेष महत्त्व आहे.ज्यांच्याकडे हा सण साजरा होतो त्यांना या संदर्भात विचारले असता वडिलोपर्जित चालत आलेली परंपरा हे

१९४
भूमी आणि स्त्री