पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 असेही वेगळेपण -
 कमलताई तांबे (१९९२ साली वय ८१) यांचे माहेर धारवाड तर सासर सांगली. यांच्याकडे श्रावणातील पहिल्या शुक्रवारी तांब्याच्या लोट्यावर हळदकुंकवाने चन्द्रसूर्य, जिवतीचा पाळणा अशी चित्रे काढतात. तांब्यात तांदूळ, हळकुंड, सुपारी हळदकुंकवाच्या पुड्या, बांगड्या पैसा या वस्तू ठेवतात. गंध उगाळण्याची सहाण त्यावर ठेवून त्यावर गौरीचा चेहरा रेखतात. काजळकुंकू लावतात. पुरणावरणाचा नैवेद्य करून सवाष्णीस जेवू घालतात. देवीची आरती केल्यावर घरातील लेकरांना ओवाळतात, दर शुक्रवारी सवाष्ण जेवू घालतात.
 श्रावणात शुक्रवारी मांडलेली गौर म्हणजे ज्येष्ठा, जिवती-विघ्नहारी देवी असावी. महाराष्ट्रात श्रावण शुक्रवारी मुलाबाळांच्या आरोग्यासाठी जिवतीचा पूजा केली जातेच. भाद्रपद शुद्ध सप्तमीस येणाऱ्या गौरीबरोबर नवमीस हिचेही विसर्जन होते. कोकण, कोल्हापूर भागात खड्याच्या वा तेरड्याच्या झाडांच्या गौरी मांडतात. कोकणात वा सांगली कोल्हापूर भागात या विविधरंगी फुलांना गौरीची फुले असेच नाव आहे. सप्तमीच्या दिवशी नदी वा पाणवठ्यावर एखाद्या कुमारिकेला घेऊन जातात. तिथून सातखडे पाण्यात धुऊन ताम्हणात ठेवून ते पुढील दाराने घराजवळ आणतात. त्या कुमारिकेचे दूध, पाण्याने पाय धुतात. तिला ओवाळतात. घराच्या दिशेने, घरात हळदीकुंकवाची पावले रेखतात. त्या पावलांवर पाऊल ठेवून कुमारिका घरभर हिंडते. घरातील प्रमुख स्त्री त्या कुमारिकेला विचारते 'इथे काय आहे?' ती उत्तरते 'इथे उदंड आहे' शेवटी मुलगी देवघरात जाते. या खड्यांच्या गौरीची प्रतिष्ठा, तांब्याच्या गौरीजवळ केली जाते.
 तेरड्याच्या.... गौरीफुलांच्या लक्ष्म्या -
 कोल्हापूर भागात तेरड्याच्या झाडांच्या लक्ष्म्या मांडतात. महालक्ष्मी उभी करतात. तिच्या शेजारी गणपती ठेवतात, अष्टमीला दुसरे दिवशी अनेक जणींच्या अंगात येते. अंगात आलेली बाई जिच्या ओटीत गणपती टाकील तिला मूल होते अशी श्रद्धा आहे. या परिसरात नवमीला सकाळीच लक्ष्मी उठते. जमलेल्या महिला एकमेकींची गहू आणि काकडीने ओटी भरतात.

भूमी आणि स्त्री
१९१