पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकरी कुटुंबात तिला निरोप देताना ओटी भरतात. दशम्यांची शिदोरी बांधून देतात. घंटा वाजवीत तिला तुळशीपर्यंत पोहोचवतात. रात्री मुखवटे उतरवून नीट ठेवतात. सजावट, मांडणी आवरून ठेवतात.
 मातंग चर्मकार समाजातही लक्ष्म्या -
 हा सण महाराष्ट्रातील अठरापगड जातिजमातीत एकाच उत्साहाने आणि श्रद्धेने पाळला जातो. लक्ष्म्या उभ्या करणे, राशींची पूजा, पुरणावरणाचा व १६ भाज्या चटण्यांचा नैवेद्य, फराळाचे जिन्नस आदी सर्व बाबी समान पद्धतीने पाळल्या जातात. मांग समाजात लक्ष्म्या श्रद्धापूर्वक आणि विधिपूर्वक मांडल्या जातात. महार समाजातही लक्ष्म्या मांडल्या जात. मात्र नवबौद्ध धर्म स्वीकारल्यावर अनेकांनी हिंदू सण त्यागले. त्यात लक्ष्म्याही आल्या. मात्र ज्यांचा उदरनिर्वाह स्वतःच्या शेतीवर आहे. अशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. लक्ष्म्यांची मांडणी धनधान्याच्या समृद्धीसाठी, जमिनीची सुफलनशक्ती भरारून वाढावी यासाठी असतो. हा कल्पनाबंध शेतकरी समाजाच्या मनात रुजल्यामुळे हा सण त्यागणे मनाला डाचते. प्रतीकात्मक पद्धतीने श्रद्धा व्यक्त केल्या जातातच.
 राणी सावरगावचे आश्चर्य -
 राणी सावरंगावच्या रेणुकेचे पुजारी श्री. सावरगावकर यांच्याकडील लक्ष्भ्यांपुढे पिलावळीत दोनही मुली आहेत. पिलावळीत मुलगे वा एक मुलगा व एक मुलगी असते. दोनही मुलीच असणे व मुलगा नसणे हे एक आश्चर्यच आहे. हे मंदिर रेणुकेचे आहे.
 दैवतशास्त्र असे सांगते की ग्रामदेवता सर्वात प्राचीन असतात. त्या कृषिदेवतांतून निर्माण झाल्या. त्यांच्या घडीव मूर्ती नसतात. तर तांदळे असतात. दगड असतात. त्यांच्या सहचराचे ठाणे त्यांच्यापासून दूर असते. त्या स्वयंभू, स्वप्रतिष्ठित असतात. काळाच्या प्रवाहात त्यांचे उन्नयन करण्याच्या मानसिकतेतून देवळे बांधली वा मूर्ती बसविल्या. जुन्या परंपरांचे अवशेष वा संकेत अशा वेगळेपणातून व्यक्त होत असतील का?

१९०
भूमी आणि स्त्री