पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानत नाही. भारतीय लोकसंस्कृतीत इतके वैविध्य आहे, इतके वैचित्र्य आहे, इतक्या जटिल गुंतागुंती आहेत की त्यांचे चिकित्सक विश्लेषण करून त्याचा मूळ गाभा शोधणे कठीण व्हावे.
 आज जे विधी अर्थहीन वाटतात, ज्या गाण्यातील शब्द परस्परांशी असंबद्ध वाटतात त्यात एकेकाळी जीवनाचे चैतन्य एकवटलेले होते. परंतु कालौघात विधींमागील मूळ संदर्भ तुटून जातात. कालानुरूप नवे संदर्भ चिकटवले जातात आणि त्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र बनत जाते. त्यामुळेच भारतीय समाजातील विधींच्या आणि आचार विचारांच्या अभ्यासात खूप अडचणी निर्माण होतात.
 द्रविड, आर्य, दास, दस्यु, असुर पणिन् अशा अनेकविध टोळ्यांच्या संघर्ष - समन्वयातून..... त्या नंतरच्या समरसतेतून आगळ्यावेगळ्या पोताची भारतीय संस्कृती निर्माण झाली आहे.
 संघर्ष-समन्वय यातून नवस्वीकृती प्रक्रिया -
 अँग्लोसॅक्सन वा इंडोयुरोपीय भूमिका घेणाऱ्या विचारवंतानी सुरुवाती पासून अशी मांडणी केली की द्रविड हे भारतातील एतद्देशीय तर आर्य बाहेरुन आलेले. मोहंजोदारो, हरप्पा उत्खननानंतर भारतीय लोकसंस्कृतीतील अनेक हरवलेले दुवे हाती आले. आज इंडो युरोपियन भूमिकेचा स्वीकार गृहीततत्त्व म्हणून स्वीकारण्याची गरज नाही. वर उल्लेखिलेल्या सर्व समाजांत संघर्ष झाला. संघर्षासोबत परस्परांच्या जीवन विशेषांचा त्यांनी स्वीकारही केला. रोटीबेटी व्यवहारातून सहजीवन व समन्वय घडत गेला. ही प्रक्रिया गेल्या हजारो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. 'वैदिक' आणि 'लोक' या दोन्हीही परंपरांचे प्रवाह या लोकसंस्कृतीत मिसळलेले आहेत. नंतर आलेल्या प्रवाहांनी आधीच्या परंपरांना नष्ट न करता मिळते घेतले. तर आधीच्या प्रवाहांनी नंतरच्या प्रवाहांचा स्वीकार केला. संघर्ष आणि समन्वय यातून त्यांनी एकमेकांच्या परंपरा, जीवन श्रद्धा, देवता आदींचा स्वीकार केला. या प्रक्रियांच्या संदर्भात इरावती कर्वे लिहितात- "ही ऐतिहासिक घटना म्हणजे सतत स्वीकाराची प्रक्रिया आहे. कोणत्याच वेळी दोन पर्यायी गोष्टिंमध्ये एकीचा स्वीकार व दुसरीचा कायमचा त्याग असा प्रकार दिसून येत नाही." या प्रक्रियेला त्यांनी 'नवस्वीकृती' (Aglomeration) असे म्हटले आहे.

भूमी आणि स्त्री
१३