पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतासाठी, जमिनीसाठी गायल्या आहेत.

कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जिवा ....

असे म्हणणाऱ्या तुकारामालाही परमेश्वराविषयीची निष्ठा सांगताना माहेरच्या अंगणात गुंतलेले स्त्रीचे मन आठवावे लागले.
 फेरावरच्या गाण्यांतील आगळा कथाबंध -
 महाराष्ट्रातील पंचमीच्या फेरावरील गीतांत सासूसून, नणंदभावजय, यांच्यातील भावसंघर्ष रेखाटलेला आढळतो. मात्र प्रा. मंदा धर्मापुरीकर यांच्या एम.फिल.च्या प्रबंधात बहीण भावाच्या विवाहाचा संकेत देणारे गीत आहे. हे गीत मराठवाडा आणि तेलंगणाच्या सरहद्दीवरील भागांत प्रचलित असून 'सीमाप्रदेशातील भावगंगा' या पुस्तकात ग्रंथित केले आहे. गोविंदा नावाचा भाऊ शेतात काकडीचा वेल लावतो. वेल मोठा होऊन काकड्या येतात. पहिली काकडी खाण्यासाठी, काकडी तोडून ती देवळीत-कोनाड्यात ठेवतो. त्याची बहीण सोमूती काकडी खाऊन टाकते. बहिणीने काकडी खाल्ल्याचे समजताच गोविंदा रागवतो आणि आईला म्हणतो- सोमूने खाल्लेले वाळूक तरी परत कर नाही तर तिने माझी नवरी तरी व्हावे. मुलाची ही विपरीत मागणी एकून आई रागवते आणि ती शाप देते. ऋषीचे झाड हो. ऋषीची झाड म्हणजे हादग्याचे झाड. हे झाड अगस्ती ऋषींनी दक्षिणेत आणले. अगस्तींच्या आगमनापूर्वी दक्षिणेत बहीण भावाचा विवाह रुढ असावा. आर्यांच्या आगमनानंतर ही रुढी लुप्त झाली. 'ऋषीचे झाड हो' म्हणजे बहीण भावाचा विवाह न होण्याची प्रथा वाढो.
 फेराची गाणी : पावसासाठीच्या समूहप्रार्थनांचा अवशेष -
 भुलई खेळताना एक फेर पूर्ण झाला की स्त्रिया एकात एक गुंफलेले हात क्षणभर जमिनीला टेकवतात आणि पुन्हा फेरात फिरू लागतात. झिम्म्याप्रमाणे या फेरगीतांची लय द्रुतगतीत नसते. अत्यन्त संथ लय असते. भूमी आणि स्त्री यांच्यातील एकरूपता आणि भूमीबद्दलची कृतज्ञता या कृतीतून व्यक्त होते. लोकगीतांचे प्राचीनत्व अपार असते. हजारो वर्षांचे, अनेक शतकांचे संदर्भ त्यात दडलेले असतात नागपंचमी हा श्रावणाच्या सुरुवातीचा सण. पेरण्या पूर्ण होऊन रोपे भुईतून वर आलेली असतात शेतीच्या कामात सुरुवातीपासूनच स्त्रियांचे योगदान मोठे असते. तृणधान्ये

१७०
भूमी आणि स्त्री