पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुट्टकु मुट्टकु ओ येल्ले ।मुहिना चेत्रकु यलाले
पद्दीना चेतिकी पवडालू । पाकरी मा अत्ता
पामु ओंडी पेट्टिंदी

 या गाण्यातून आपल्याला सासूने कसे मारले ते बहिणीला बहीण सांगते.
 कुटुंबसंस्था स्थिर होताना -
 कन्नड गीतातील आणि मराठी गीतातील सासू नाग खाऊ घालून सुनेला धान्याच्या डेऱ्यात ठेवते. कासईच्या गाण्यातील भाऊ पत्नीच्या आग्रहाखातर बहिणीच्या रक्ताने पत्नीची कासई रंगवून देतो. कुटुंबसंस्था स्थिर होताना स्त्रीपुरुषांतील नात्यांचे बंध नियमित केले गेले. स्त्रीचे सासर आणि माहेरातील स्थान, कुटुंबातील व समाजातील स्त्रीचे स्थान, पतिपत्नींचे शारीरिक, भावनिक, धार्मिक, सामाजिक अनुबंध यांचीही निश्चिती झाली.
 जमिनीची मशागत करून धान्याचे उत्पादन घेणारी थरवाडमधील सत्ताधारी स्त्री कुटुंबसंस्थेच्या जडणीच्या काळात 'पत्नी' म्हणून पतीच्या कुटुंबात स्थलांतरित होऊ लागली. तिथे तिचे स्थान दुय्यम झाले. स्त्रीचे माहेरच्या भूमीशी असलेले 'जोडलेपण' कुटुंबसंस्था स्थिर होऊन हजारो वर्षे झाली तरी कमी होत नाही. या सांस्कृतिक परिवर्तनाचा प्रवास स्त्रीच्या मनावर उमटलेल्या लहरी, गाण्यांतून प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. या मन्वन्तराच्या काळात विधी , व्रते, उत्सव, तत्संबंधी गीते, कथा यांत बदल घडत गेले. भूमीच्या सुफलीकरणाशी जोडलेली व्रते, कृषिदेवता, उत्सव यांचा नव्या स्वरूपात स्वीकार केला गेला. मात्र भारतात झालेल्या सांस्कृतिक आक्रमणांना अन्न आणि पाणी या जीवनावश्यक गोष्टींशी जोडलेले विधी उत्सव, व्रते पुसून टाकता आली नाहीत.
 नागचौथीचा उपास भावासाठी.... भावाच्या कृषिसमृद्धीसाठी -
 जी जमीन कसताना स्त्रीने तनमनधनाने समर्पण केले, ती जमीन बंधूच्या स्वाधीन करताना तिचे मन त्या जमिनीच्या सुफलतेसाठी सदिच्छा करीत राहिले. त्यातूनच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास आला असावा. कुरी, तिफण वा टिपणीच्या ओव्यांत, पेरणीच्या गाण्यांतून असे लक्षात येते की, या ओव्या भावाच्या

भूमी आणि स्त्री
१६९