पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुषाचा संबंध केवळ वंशसातत्यापुरताच असे. या अवस्थेपूर्वी जमिनीचे विभाजन होऊ नये या भूमिकेतून बहीण भावांनी संतती उत्पन्न करण्याची प्रथा असावी. यमयमीच्या कथेतून त्याचा संकेत आपल्याला मिळतो. पुरुषसत्ताक जीवन पद्धतीतून स्त्रीपुरुष नात्यांची निश्चिती झाली असावी. पुरुषसत्ताक आर्यांच्या संपर्कातून थरवाडमध्ये भावाचे महत्त्व वाढले असावे. दक्षिणेत मामाभाचीचा विवाह आजही समाज मान्य आहे. सख्ख्या भावाकडून वंश निर्मिती करण्याला निषिद्ध मानून आईच्या, मातेच्या भावाशी, मामाशी विवाह करून वंशसातत्य टिकविण्यास समाज मान्यता मिळाली. या प्रवासातून पुरुषाचे कुटुंबातील प्रमुखत्व स्थिर झाले असावे. या सांस्कृतिक परिवर्तनाच्या प्रवासात नाग महाराष्ट्रातील कृषिकन्यांचा बंधू झाला असावा.
 कासईचे गाणे : मराठी आणि तेलगू -
 नागपंचमीचे एक अत्यन्त भावार्ततेने आणि आवडीने गायले जाणारे गीत कासईचे. पंचमीसाठी माहेरी आलेली बहीण भावजयीची कासई.. साडी नेसते. वारूळाची पूजा करताना कासई कुंकवाने खराब होते. नणंदेने आपली साडी नेसावी हेच वहिनीला आवडलेले नाही. त्यातून ती खराब झाली. वहिनी नवऱ्याजवळ हट्ट धरते की साडी नणंदेच्या रक्तात रंगवून आणून द्यावी. पत्नीच्या हट्टाखातर भाऊ बहिणीला मारून तिच्या रक्ताने रंगवलेली साडी पत्नीला देतो. बहीण फुलाच्या रूपात आपल्या पतीला सारी कहाणी सांगते. दुसऱ्या गाण्यात सासू वारूळ पुजायला जाणाऱ्या सुनेला सापाची भाजी करून खाऊ घालते. सून मेल्यावर तिचे प्रेत धान्याच्या उतरंडीतील सर्वात खालच्या डेऱ्यात भरून ठेवते. मुलगा घरी आल्यावर पत्नीची चौकशी करतो. परंतु सासू ... मुलाची आई आपणास काहीच माहिती नसल्याची बतावणी करते. शेवटी मेलेली सून पतीच्या स्वप्नात जाऊन खरी गोष्ट सांगते. असाच कथाबंध तेलगू लोकगीतात आहे. मात्र मुलीची काही वार्ता नाही म्हणून माहेरची माणसे लेकीकडे जातात. तिच्या सासरच्या शिवारात मातीचा ढीग दिसतो. त्यावर अतिशय सुंदर फुलाचे झाडे दिसते. मुलीची धाकटी बहीण बैलगाडी थांबवून फूल तोडण्यासाठी जाते तर तिला ढिगाऱ्यातून गाणे ऐकू येते.

१६८
भूमी आणि स्त्री