पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हातातून दिवा पडला. तोही नेमका पिल्लांच्या शेपटावर. पिल्लं मोठी झाल्यावर त्याना शेपूट तुटले कसे ते कळले. जिच्या घाबरटपणामुळे आपली शेपटे तुटली तिचा वंश नष्ट करण्याच्या हेतूने नाग त्या मुलीच्या घरी आले. त्या दिवशी नागपंचमी होती. बहिणीने पाटावर नाग रेखाटले होते. त्यांना दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवून ती त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी, सुरक्षितेतेसाठी प्रार्थना करीत होती. "परमेश्वरा माझे लांड्यापुड्या नागबंधू जेथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव. त्यांचे जीवन सुरक्षित ठेव" तिची प्रार्थना ऐकून नागांना पश्चाताप होतो. ते बहिणीस शुभेच्छा देऊन परततात.
 दुसऱ्या कथाबंधात शेतात नांगराचा फाळ लागून वारुळातील नागाची पिल्लं दुखावली. संतापलेल्या नाग व नागिणीने शेतकऱ्याच्या घरातील सर्वांना दंश करून निर्वंश केले. मुलगी सासरी होती. तिला मारण्यासाठी तिथे पोहोचले. तो दिवस नागपंचमीचा होता. शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर नागकुटुंब रेखले होते. त्यांची ती पूजा करीत होती आणि ईश्वराजवळ नागवंशाला दीर्घायुष्य आणि समृद्धी मागत होती. तिची प्रार्थना ऐकून नागांना पश्चाताप झाला व त्यांनी तिचे माहेर जिवंत केले. बहिणीला शुभाशीर्वाद दिले.
 नागपंचमी की नागरपंचमी ? -
 श्री. गं. बा. ऊर्फ आबासाहेब मुजुमदारांच्या दृष्टीने ही नागाची पंचमी नसून नागरपंचमी आहे. आदिमायेच्या शक्तीस नाथपंथियांनी वेगवेगळी नागकुलदर्शक नावे दिली होती. उदा, नागिणी, सर्पिणी इत्यादी. ही सर्व नावे सांकेतिक असून योगपरिभाषेतील आहेत. नागर या शब्दाचा मूळ अर्थनगरात राहणारा. परंतु नाथपंथी संकेतानुसार विरुद्ध अर्थ करण्याची प्रथा मुळारंभी असल्याने नाग म्हणजे पर्वत त्यात राहणारे ते नागर. ही नाथपंथी योग्यांची नागरपंचमी आहे. ते नागरकुळ ज्या वारुळात अधिष्ठित झाले त्या वारुळाची म्हणजे आदिशंकराची ती पंचमी आहे. असे म्हणावे लागते. श्री. मुजुमदार म्हणतात, त्या वारुळाप्रीत्यर्थ जो सण सुरू झाला तो आजही घरोघर पाळण्यात येतो.
 कालियामर्दनाची आठवण करून देणारा दिवस -
 श्रीकृष्ण यमुनातीरी खेळत असताना चेंडू डोहात पडला. तो डोह कालिया नागाने

१६२
भूमी आणि स्त्री