पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिफणीनं पेरा केला, बांधावरी डेरा दिला....
पड पड मेघराजा, माझं माहेर धरुनी
गवळी निघाले पेरूनी....
पडपड पावसा, पड तू आतीरीती
कुणबी आले काकुळती...
पड़ पड पावसा, होऊदे वली माती
गाईच्या चाऱ्यासाठी, कुणबी आले काकुळती...

 मानवाच्या सांस्कृतिक प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी शिकारी अवस्था, प्राथमिक स्वरूपाची शेती आणि पशुपालन हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. या अवस्था एकाच वेळी कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात होत्या, त्यात कालक्रमानुसार संगती लावणे कठीण आहे. एक अंदाज मात्र बांधता येतो तो असा. शेती आणि पशुपालन या दोन्हीची जुळणी होऊन ते परस्परपूरक व्यवसाय झाले. भारतीय संस्कृतीच्या विकासाचा मागोवा घेताना दोन मूलभूत प्रवाहांकडे वैदिक, अवैदिक वा लौकिक प्रवाहांकडे सखोल आणि पारदर्शी नजरेने पाहणे गरजेचे ठरते. शिकारी अवस्थेतून माणूस शेती आणि पशुपालन या दोन व्यवसायांकडे वळला. या दोहोंची समान्तरपणे प्रगती होताना दिसते. या दोहोंचा जीवनवृत्ती म्हणून स्वीकार करणाऱ्या समाजांनी परस्परांचे आचार विचार स्वीकारत एकमेकांचे व्यवसाय स्वीकारले. हे दोनही परस्परपूरक व्यवसाय बनले. त्याचे भावचित्र वरील ओव्यांतून प्रतिबिंबित झाले आहे.
 स्त्रिया आणि पेरणी -
 धरणी समान सर्जन क्षमता असणाऱ्या स्त्रीला पूर्ववैदिक काळापर्यन्त अनन्यसाधारण महत्त्व होते. तिला येणारी मासिक पाळी सौभाग्याचे लक्षण मानले जाई. माहेरवशिणीने पहिला पेरा पेरावा अशी रीत होती. या आशयाच्या अनेक ओव्या आहेत. तसेच पेरणीशी संबंधित ओव्यांतून भावाचे शेतात पाऊस पडावा, त्याचे शेतात भरपूर धान्य व्हावे अशा शुभेच्छा बहिणीने मनापासून भावाला दिल्या आहेत.

१५४
भूमी आणि स्त्री