पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माहेरवाशीण ही सर्वश्रेष्ठ सवाष्ण मानली जाते. सवाष्णीने केलेला पेरा भरपूर पीक देतो अशी लोकमनातील श्रद्धा आहे. ती वरील ओव्यांतून व्यक्त होते. आजही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातही स्त्रियांकडून पेरणी करवून घेण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. उत्तम पेरा करणाऱ्या स्त्रियांना पेरणीसाठी सन्मानाने बोलावले जाते. लातूर जिल्ह्यातील पारधेवाडी या गावच्या कडाबाई कवे या उत्तम पेरा करणाऱ्या म्हणून त्या परिसरात ख्यातनाम आहेत.
 जयजय गणपती -
 तिफण नवी असेल तर मात्र सुतार स्वतः शेतात जाऊन तिफण भरतो. शेतातच सुताराला गंधाक्षता लावून ज्या धान्याचा पेरा करायचा ते धान्य त्याला सुपाने दिले जाते. सूप हे सुबत्तेचे, लक्ष्मीचे प्रतीक आहे. तिफणीच्या चाडाला जो दोर बांधला जातो त्याची विशिष्ट प्रकारची गाठ असते. ती काही जणांनाच घालता येते. या पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करताना त्यांची वाळव काढली जातात. ते कैस पिंजून त्याचा दोर तयार करतात. ही गाठ अशा खुबीने मारली जाते की, तिफण फिरत असताना जमिनीच्या पातळीनुसार ती गाठ मागे वा पुढे व्हावी, तसेच घट्ट वा सैल व्हावी. या गाठीनुसार पेरा नीट होतो. तिफण पुढे झुकली तर 'शाव' आली म्हणतात आणि थोडी मागे झुकली तर 'करळ' आली म्हणतात. ती मधोमध राहावी ही अपेक्षा.या गाठीमुळे तीमधोमध राहते व चाड नळ्यावर व्यवस्थित बसते. तिफणीत धान्य भरताना सुतार मंत्र म्हणतो -

जय जय गणपती काम लागू दे सुती
जयजय माते लक्ष्मी जय दे
पिकू दे पिकू दे उदंड पिकू दे

या मंत्रातील आधुनिकता कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. मंत्रातील अक्षरे कालानुरूप बदलत असतात. परंतु ती विशिष्ट लयीत विशिष्ट पद्धतीने तीनदा वा सातदा उच्चारली जातात. गणपती आणि लक्ष्मी कृषिसमृद्धीच्या देवता आहेत.

१५२
भूमी आणि स्त्री