पान:भूमी आणि स्त्री.pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आवष्णीचं पाणी जसं गंगेचे पाणी या ओळीतील गंगेच्या पाण्याचा संदर्भ खंडोबाच्या कथेतून तर आला नसेल ?
 राळ्याचा उल्लेख या गीतात आहे. राळा हे प्राचीन काळातले महत्त्वाचे अन्न होते. राळा हे अग्नितत्त्व आहे. राळ उडविणे हा वाक्प्रचार मराठीत रूढ आहेच. राळ्याचा भात आजही कोकणातल्या गरिबाचे महत्त्वाचे अन्न आहे. वसुबारसेस राळ्याचा भात करून खाण्याची रूढी महाराष्ट्रात प्रचलित आहे.
 हनुमंत बाळ : वीरदेवता -
 हा गाण्यातील 'हनुमंत बाळ' ही वीरदेवता आहे. महाराष्ट्रात दोन प्रकारच्या हनुमंताच्या प्रतिमा आहेत. भक्त हनुमान हा रामाच्या सेवकाच्या रूपात असतो. त्यालाच दास हनुमान वा दास मारूती म्हणतात. वीर मारूती वा वीर हनुमान ही क्षेत्रपालक देवता आहे. आर्यपूर्व संस्कृती, आर्येतर समाज यक्षपूजक होते. वैदिकांच्या मते यक्षासारख्या अद्भुत देवांवर विश्वास ठेवणारे लोक अविकसित बुद्धीचे होते. यक्ष ही लोक-देवता मानली जाते. एकेकाळी यक्षपूजा सर्वत्र प्रचलित असावी. कारण वेदोत्तर साहित्यात, बौद्ध, जैन साहित्यात यक्षांचे उल्लेख विपुल प्रमाणात येतात. वैदिक देवदेवतांचे महत्त्वसमाजात वाढू लागले तरी 'यक्ष' कल्पनेचे समूळ उच्चाटन झाले नाही. 'वीरपूजा' ही प्राचीन यक्षपूजेचाच अवशेष आहे. आपण मारूतीला 'महावीर' म्हणतो. तो यक्षनियंत्रक आहे असे मानले जाते. आश्विनात होणाऱ्या वर्षन सर्जनाच्या उत्सवांच्या विधिगीतांतून येणारे हनुमान, खंडोबा, मुंजा, भुलोबा यांचे उल्लेख क्षेत्रपाळ यक्षपूजेचे अवशेष आहेत. भुलाबाईचे हे नमनगीत अतिशय जुने असले पाहिजे. कारण त्यातील शब्दांशब्दांत संगती लावताना त्यात पडलेले अंतर जाणवते.
 या गीतातील सीता : भूमिस्वरूपात -
 खंडोबा त्यांच्या नारी, हनुमंतबाळ यांच्या पाठोपाठ सीतेचा संदर्भ येतो. अर्थात या गीतांतील सीता केवळ सती आणि रामपत्नी म्हणून या गीतांत येत नाही. सीतेचा रामपत्नी म्हणून लोकगीतांतून स्वतंत्रपणे उल्लेख येतो, तेव्हा तिच्या वनवासाचे किंवा वनवासी मातृत्वाचे संदर्भ येतात. उदा. ---
 १. सीतेच्या हाती फुलाच्या गजरा
  रामाच्या हाती बाण

११८
भूमी आणि स्त्री