Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
९७
 

वागत असता शत्रूंनी अधर्माने तुझे राज्य हिरावून घेतले, द्रौपदीला भर सभेत आणून तिची अप्रतिष्ठा केली, आपणांस वास्तविक योग्य नसताना झाडाच्या साली व कातडी नेसवून तेरा वर्षेपर्यंत वनवासास घालविले, या सर्व काळजास पीळ पाडणाऱ्या गोष्टी क्षात्रधर्माप्रमाणे वागावयाचे म्हणून मी सहन केल्या. आणि आज ती अति नीच अधर्माची कृत्ये मनात सलत असल्यामुळे शत्रूंचा निःपात करून टाकण्यास आम्ही उद्युक झालो असताना तू धर्मज्ञानाची इच्छा करीत आहेस ! तू कठोर भाषण करून माझ्या काळजाला घरे पाडीत आहेस. आमच्या जखमेवर मीठ चोळीत आहेस आणि वाक्शल्यांनी माझे अंतःकरण विदीर्ण करीत आहेस ! अरे, तुझ्या पुरत्या षोडशांशाचीसुद्धा ज्याला सर नाही त्या अश्वत्थाम्याची तू प्रसंशा करतोस ! अर्जुना, तू मोठा धार्मिक आहेस ! पण हा स्वतःचा दोष मात्र तुझ्या ध्यानात येत नाही. अरे, शत्रूची प्रशंसा करून आपल्याच लोकांना भिवविण्यात तुला लाज कशी वाटत नाही ? तू काय समजला आहेस? मला तूं अश्वत्थाम्याच्या गोष्टी सांगतोस ! अरे मी क्रुद्ध झालो तर पर्वताच्या ठिकऱ्या करीन, पृथ्वी विदीर्ण करून टाकीन व इंद्रासह देवांनाही रणातून पळवून लावीन. हे वीरा, अशा प्रकारचा तुझा भाऊ आहे तोपर्यंत द्रोणपुत्राचे भय धरण्याचे कारण तुला नाही.' -(द्रोण १९७).
 अर्जुन व धृष्टद्युम्न यांची यानंतर याच विषयावरून पुष्कळ बाचाबाची झाली. पण सुदैव असे की अर्जुनाने आपल्या गुरुभक्तीची तड पोचविली नाही. त्या निष्ठेमुळे त्याने धर्मभीमांना सोडून दिले असते तर अनर्थच कोसळला असता. पण लवकरच तो शांत झाला. आपण पितामह भीष्मांच्या बाबतीत असलाच 'अधर्म' केला आहे हे त्याच्या ध्यानी आले व त्याने आपल्या गुरुभक्तीला
 .. ७