पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जमीन आमची, भाव आमचा



 विषय लढा
 चिखली-कुदळवाडी सुमारे १५०० लोकसंख्येचे छोटेसे गाव. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गापासून नाशिककडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग फुटतो, त्या दुबेळक्यात भोसरीची उद्योगमहानगरी आणि भोसरी गाव बसले आहे. देशातील सगळ्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी ही एक. पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेच्या क्षेत्रात ही वसाहत येते आणि त्यामुळे ही महानगरपलिका हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत समजली जाते. औद्योगिक वसाहतीची हद्द संपते तेथे टाटांच्या टेल्को कंपनीचा ट्रक तयार करण्याचा कारखाना आहे. हिंदुस्थानातील हा सर्वात मोठा कारखाना. कारखान्याच्या पूर्व-पश्चिम कुंपणाच्या भिंतीला लागून एक डांबरी सडक जाते येथे चिखली-कुदळवडी गाव आहे. चिखलीला लागून पंढरीच्या वारकऱ्यांचा देहू-आळंदी रस्ता जातो. त्या रस्त्याला ही सडक मिळते. टेल्कोच्या भिंतीची संगत सुटल्यानंतर सडक आपला गुळगुळीतपणा, तुकतुकीतपणा सोडून देते. गावातून जाणारा रस्ता आपला कच्चा, ओबडधोबड, खाचखळग्यांनी भरलेला आणि पावसाळ्यात चिखलाने भरून जाऊन गावाचे चिखली नाव सार्थक करणारा.

 १५ मे १९९३ पासून गावाचा रंग एकदम बदलला आहे. तरुण पोरे छातीवर अभिमानाने शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून फिरत आहेत. सडकेच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर संघटनेच्या घोषणा रंगवल्या जात आहेत. 'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'आमची जमीन, आमचा भाव,' चिखली गाव लवकरच संपणार आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी पिंपरी-चिंचवड महानगरीच्या पसरत्या विळख्यात नष्ट होणार आहे. तेथे आधुनिक कारखानदारी आणि छानछोकीचे विलासी बंगले, गाळे उभे राहणार आहेत. हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महानगरीच्या

बळिचे राज्य येणार आहे / ६७