पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/392

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुंडाची मणगटशाही चालते.
 दहा-पाच गावच्या गटांच्या काही अडचणी असतात. बांधबंदिस्ती, पाझरतलाव, छोटे पाटबंधारे अशा तऱ्हेच्या योजना तयार करून त्या राबवून घेऊन शेतीची सुधारणा केल्याखेरीज त्या भागातील शेतकऱ्यांना शेतीवर जगणेच शक्य नसते.
 अशी अनेक दुःखे आणि अनंत अडचणी. कोरडवाहू शेतकऱ्याचे आकाशच फाटलेले त्याला ठिगळे कुठे कुठे म्हणून लावावीत आणि दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ताकद कुठून आणावी?
 काही ठिकाणी शेतकऱ्यांची स्थिती जरा बरी असते. अशा ठिकाणी काही शेतकरी एकत्र येतात. सहकारी पद्धतीने उपसा योजना वगैरे करून पाण्याची सोय करू बघतात. शेतीला लागणारी वरखते, औषधे, बी-बियाणे एकत्र खरेदी करून खात्रीशीर माल योग्य भावांत मिळावा असा प्रयत्न करतात. तयार झालेला शेतीमाल सहकारी पद्धतीने एकत्र करून त्याची विक्री चांगल्या भावाने करू पाहतात.
 उसाच्या बागायतदारांनी यापुढे पाऊल टाकून सहकारी साखर कारखाने काढून अफाट प्रगती केली आहे. दूध उत्पादकांनी सहकारी पद्धतीने व्यवसाय करूनही आपली बरीच प्रगती करून घेतली आहे.
 शासनाकडून अशा प्रयत्नांना काही साहाय्यही मिळते पण आजपर्यंतचा सर्वसाधारण अनुभव असा आहे, की काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडल्यास बहुतेक संस्था मरगळल्या आहेत किंवा बंदच पडल्या आहेत. याला कारणे अनेक आहेत. त्यांचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल; पण सहकारी संस्थांच्या अपयशाची महत्त्वाची कारणे म्हणजे त्यातील कारभारी मंडळीतील कुशलतेचा व सचोटीचा अभाव हीच होत.

 अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. काहीचे व्यवहार थंडावले आहेत काही बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. ज्या काही चालू आहेत त्यांच्या व्यवहारावर काही कारभारी मंडळी गबर होत आहेत राजकारण करत आहेत. सभासद शेतकऱ्यांच्या परिस्थितीत जवळ जवळ फरक नाही आणि काही संस्थांच्या सभासदांची परिस्थिती संस्था बंद पडल्यामुळे आणखी खराबच झालेली आहे. त्यांच्या नावावर कर्जे चढली आहेत. त्यांच्या जमिनी गहाण पडलेल्या आहेत आणि संस्था बंद असल्यामूळे फायदा काहीच नाही.

बळिचे राज्य येणार आहे / ३९४