पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/384

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतीचा माल जवळ जवळ सगळा एकाचवेळी बाजारात उतरतो हेही आपण पाहिले अर्थातच हे उघड आहे की ज्या काही भाग्यवान शेतकऱ्यांची शेती आकाशातून पडणाऱ्या पाण्यावर अवलंबून नाही त्यांना पाहिजे तो माल पाहिजे तेव्हा काढून बाजारभावांच्या कहारातून मुक्तता घेता येते.
 शेतीमाल म्हणजे जगण्यासाठी आवश्यक अशा वस्तू. बागायतदारांनी काढलेल्या मालास स्पर्धा जवळजवळ नाही आणि मालही त्यामानाने चांगल्या प्रतीचा. यामुळे बागायती शेती खूपच किफायतशीर ठरू शकते. आधुनिक शेतकी तंत्राचा अभ्यास व वापर करून या वर्गाने शेतीबाबत खरोखर काही चमत्कार घडवून आणलेले आहेत.
 बागायतदारांचा उगम
 बागायती शेतीची सुरुवात साहजिकच नदी तलाव इत्यादी पाण्याच्या नैसर्गिक साठ्याशेजारी होते. विहिरीच्या पाण्यावर बारमाही बागायती आपल्या प्रदेशात थोड्याप्रमाणावर होऊ शकते. इंग्रजी राज्य येण्यापूर्वी धरणे पाटबंधारे ही आपल्याकडे अस्तित्वात नव्हती. थोडीफार तळी बांधलेली असत. तीही मुख्यतः पिण्याच्या कामासाठी इंग्रजी राज्यात धरणे व पाटबंधारे कामांची खूपच प्रगती झाली. वारंवार येणारे दुष्काळ टाळण्यासाठी ही कामे हाती घेण्यात आली. देशभरच्या शेतीला या तऱ्हेने पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही. अगदी कमाल म्हणजे २०% जमीन कधी काळी बागायती होऊ शकेल. देशाची जलसंपत्ती योग्य रीतीने वापरली जावी म्हणून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या योजना पार पाडल्या जातात. ज्या भागांना अशा योजनांमुळे पाणी मिळते त्या भागांवर साहजिकच एक जबाबदारी पडते. या पाण्याचा उपयोग देश परिस्थितीस आवश्यक अशी पिके काढ्याकरता होईल व आणि या योजनांभोवतालच्या प्रदेशात 'धान्याची कोठारे' तयार होतील अशा हेतूने पाटबंधारे योजना तयार करण्यात आल्या. सार्वजनिक पैसा त्यावर खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली ती अशा कल्पनेने, की नवीन बागायती जमिनीत धान्याची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊन देशात पुन्हा दुष्काळी उपासमार होणार नाही.
 गुंडराज्याची स्थापना

 पाटबंधाऱ्यांचे पाणी एकदा वाहू लागल्यानंतर मग मात्र घडले ते मोठे चमत्कारिक. नवीन बागायती जमिनी धान्याच्या पिकांसाठी क्वचितच वापरल्या गेल्या. बहुतेक जमिनींचा उपयोग ऊस, तंबाखू इत्यादी नगदी पिकांसाठी होऊ

बळिचे राज्य येणार आहे / ३८६