प्रवाहात जगणेच शक्य नव्हते.
खेड्यापाड्यात जनसामान्यांचे आयुष्य असेच थबकलेले होते. अनेक राज्यकर्ते आले आणि गेले. सर्वांनी रयतेला वेगवेगळ्या प्रकारे नाडले. खेडुत जनतेच्या मनात राज्यकर्त्यांपैकी कोणी काही भले करील अशी आशाच राहिलेली नाही. आपल्या दारिद्र्याचा उगम कोठे आहे याचा शोधच लागत नाही आणि त्यातून सुटायला उपायही दिसत नाही. कोठे जावे, काय करावे हे समजेनासे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणाले, "येणे दुःखे माझा फुटो पाहे प्राण". पिढ्यान्पिढ्या तीच दुःखे भोगून आम्ही असे बधिर झालो आहोत, कोडगे झालो आहोत, की या दुःखाने आमचे प्राण कासाविससुद्धा होत नाहीत. मग मन रमविण्यासाठी आम्ही आपापसांतच भांडणे काढून ती झुंजत बसतो. बाहेरून अपमान होऊन आलेल्या गड्याने घरात बायकापोरांवर आरडाओरड करून आपले पुरुषत्व गाजवावे अशी आमची भांडणे आहेत.
नवा पुरुषार्थ
न्यायनिवाडा करून ही भांडणे मिटण्यासारखी नाहीत. त्यात अर्थही नाही. आम्ही ही भांडणे भांडतो कारण आमच्या मनाला गुंतवू शकेल, मोहवू शकेल असा दुसरा खरा पुरुषार्थाचा मार्गच आमच्या दृष्टीसमोर नाही, असा पुरुषार्थ पुढे दिला की शिवाजीच्या अवताराच्या वेळी घडले त्याप्रमाणे 'कोंढाणा पहिला, रायबाचं लगीन मागाहून' ही भावना तयार होईल.
शेतकरी संघटनेचे पहिले साधन म्हणजे असा नवा पुरुषार्थाचा मार्ग दाखवून देणे आहे. यासाठीच शेतकरी संघटना ही पक्षभेद मानत नाही, जातिभेद धरत नाही, तिच्या लेखी धर्मभेद नाही, लहानमोठ्यांत फरक नाही. शेतकरी तितका एक एक!
नवा पुरुषार्थ कोणता ? तर तो हा की शेतकऱ्यांस नवे स्वातंत्र्य मिळवावयाचे आहे. जेथे भारताच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्याचे स्वत:चे शासन तयार होईल आणि शेतकऱ्यांची गुलामगिरी संपेल. त्याला पोटभर खायला मिळेल. त्यांच्या बायकापोरांस सुखाचे दिवस आणि उज्वल भविष्य दिसेल. आज त्याला हे मिळत नाही कारण एक जगव्यापी षडयंत्र त्याला ताब्यात ठेवत आहे. हराम त्याच्या कष्टावर मौजमजा मारीत आहेत. त्याच्या घामावर दाम कमवित आहेत.