पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पर्यायाला पर्याय नाही. तुम्ही जर असं म्हटलं की ही 'युरिया'ची शेती चालवत राहाल, 'एन्डोसल्फान' ची चालवत राहाल तर ते शक्य नाही. याचं पहिलं कारण असं की येत्या दहा वर्षांत जगामध्ये तुम्हाला पुरेल इतका 'युरिया' पुरवेल इतकं पेट्रोल शिल्लक राहणार नाही आणि तुम्ही 'एन्डोसल्फान' मारून भाजी पिकवली तर ती खाणारांना कॅन्सर होतो हे सिद्ध होत आहे. त्यामुळे ही भाजीसुद्धा पुढे कुणी खाणार नाही. दुसरा मार्ग आपल्याला शोधायलाच लागणार आहे. तो शोधायचा कसा? त्याचे आचरट मार्ग सांगणारे पुष्कळ निघताहेत. कालच एका ठिकाणी गेलो होतो. त्यांच्याकडे पीक चागलं निघतं असा त्यांचा दावा आहे आणि 'अमक्या अमक्याचं असं म्हणणं आहे की गोमूत्राचा वापर केला तर चांगलं पीक निघतं' असं ते भक्तिभावानं सांगतात. मी विचारलं, "गोमूत्राच्या ऐवजी म्हशीचं वापरलं तर चालेल की नाही हो? पण त्यांचं अंतःकरण गलबललं. त्यांना सांगायचं होतं की, "आमच्या पूर्वजांनी गाईला पवित्र मानलं. त्याचा यामागं आधार काही तरी आहे" म्हणजे, शेतकऱ्यांची काय ओढाताण चालली आहे? आम्ही एका बाजूला युरियासारखा पेट्रोलियम पदार्थ वापरा महणून सांगणाऱ्या दलालांच्या हातून सुटू पाहतो आहोत तर तेवढ्यात आम्हाला हे जुने गायत्रीमंत्र शिकवणारे पंडित आपल्यात ओढून घ्यायला पाहत आहेत आणि सीताशेतीचा खरा अर्थ असा आहे की या जुन्या आणि नव्या दलालांपासून, दोघांपासूनही वाचून बुद्धीवर शेती करायला शेतकरी तयार झाला आहे. हे काम मी माझ्या बुद्धीप्रमाणे कुणावर सोपविलं आहे? शेतकऱ्यांना तर आपली शेती करायचीच आहे. दररोजची शेती चालवायची आहे, पोट भरायचं आहे. सीताशेतीचा निष्कर्ष कळेपर्यंत शेती आपल्याला बंद नाही ठेवता येणार. ते काम आपल्याला चालूच ठेवायचं आहे. मग हे काम ज्यांना आजपर्यंत आपण सर्वात निर्बुद्ध समजलो, 'त्यांना काय अक्कल, तुमची अक्कल चुलीपुढं' असं म्हणून हिणवलं त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी स्त्रियांनी प्रामुख्याने पार पाडावं अशी मी योजना केली. आणि सुरुवात त्यांनीच केली आहे. पहिली शेती काही पुरुषांनी नाही केली. पहिली शेती स्त्रियांनी केली नुसत्या काटक्या घेऊन. त्या जमिनीमध्ये नांगर घालणे म्हणजे भूमातेला जखमी करणे असं समजत असत आणि शेती करीत असत. स्त्रियांना बाजूला करून पुरुषांनी शेती हातात घेतली कारण बैलाला वेसण घालणे आणि बैलाने नांगर ओढून घेणे ही ताकद शेतकरी पुरुषाकडे आली. शेतीवर पहिला पराभव स्त्रियांचा झाला आणि बैलवाले पुरुष पुढे आले आणि या बैलवाल्या

बळिचे राज्य येणार आहे / ४०