कार्यालयात त्या शेतकऱ्याची प्रतिकृती आहे आणि १९८४ साली छातीवर लावलेला बिल्ला रात्री झोपतानाही माझ्या छातीवर असतो. त्यामुळे, नानांची आठवण सतत मनात जागत असते, याबद्दल कोणी शंका घेण्याचे कारण नाही.
तरीसुद्धा या सत्कार समारंभाच्या सुरुवातीला मी, थोडेसे औचित्यभंग करण्यासारखे वागलो त्याबद्दल सर्वांची माफी मागून खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीला पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम होता. या सत्कारसमितीचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांना विनंती करून मला या कार्यक्रमातून वगळावे अशी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. १९८४ साली परभणीला झालेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला. नंतर सगळ्या पक्षांनी त्याची नक्कल करायला सुरुवात केली; पण 'कर्जमुक्ती'ची खरी मांडणी पहिल्यांदा झाली ती शेतकरी संघटनेच्या परभणी अधिवेशनात. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जी काही कर्जमाफीची योजना जाहीर केली ती फाटकीतुटकी, शेतकऱ्याशेतकऱ्यांत केवळ फूट पाडणारी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता ठेवून पुढाऱ्यांच्या बँकांची आणि सहकारी संस्थांचीच फक्त भर करणारी योजना पाहिल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीने पुन्हा एकदा कर्जमुक्तीचे आंदोलन प्रखर करण्याचा निश्चय केला आणि जोपर्यंत हिंदुस्थानातील समग्र शेतकरी सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेच्या मंचावर कोणीही हारतुरे, शाल-श्रीफळांचा सत्कार स्वीकारणार नाही असा ठराव केला. ज्या अर्थी श्रीरंगनाना या मंचावर आहेत त्या अर्थी हा मंच, सत्कार समितीने उभा केला असला तरी तो शेतकरी संघटनेचाच मंच आहे असे मी मानतो आणि म्हणून मी सुरुवातीला हारतुऱ्यांचा सत्कार अव्हेरला.
मला नानांचेही आभार मानायचे आहेत, नानांनी या समारंभाला मान्यता दिली त्याबद्दल. त्यांनी जर 'हो' म्हटले नसते तर तुम्हा सर्वांना भेटण्याचा योग आला नसता. आज सकाळी माझ्या मनात आले की नानांचा अमृतमहोत्सव सत्कार करायला, खरे तर, सर्वांत योग्य जागा ज्या जागी पहिल्यांदा आमचे सूर खऱ्या अर्थी जुळले तीच असायला पाहिजे. म्हणून नानांना भेटण्यासाठी मी मोरेवाडीला नानांच्या वाड्यावर गेलो. नाना वाड्यावर नव्हते, ते त्यांच्या नव्या घरी बसलेले होते. मी त्यांना फोनवरून म्हटले की, "ज्या देवडीमध्ये आपण पहिल्यांदा भेटलो, जेथे पहिल्यांदा शेतकरी संघटनेच्या सिद्धांताच्या