शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि तंत्रज्ञान यांच्याशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य ताबडतोब मिळण्यानेच खुला होणार आहे. त्यांना हेही माहीत आहे की, 'इंडिया'च्या सततच्या चाळीस वर्षांच्या आर्थिक आक्रमणामुळे तयार झालेल्या सडलेल्या अवस्थेतूनही 'भारता'चे पुनरुत्थान होणार आहे. फक्त, संरचना आणि तंत्रज्ञान यांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘मार्शल प्लॅन'सारखी एखादी योजना आवश्यक आहे.
तिरुपती येथील राष्ट्रीय शेतकरी परिषदेने अगदी निकराचे आवाहन केले आहे, त्याने तरी सरकारला जाग येईल या आशेने.
शेतकऱ्यांनी स्वत:पुरते आणि आपल्या गावापुरतेच पिकवले तर सरकारला जागे व्हावेच लागेल. स्टॅलिनने अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा त्यांच्या शेतकऱ्यांवर रणगाडे घातले; हिंदुस्थान सरकार थोडा बरा विवेक दाखवील अशी शेतकऱ्यांच्या संघटनांना आशा आहे.
(शेतकरी संघटक, ६ एप्रिल २०००)
'मार्शल प्लॅन' उगमाचे भाषण
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
सभ्य जन हो, जगाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे याची तुम्हाला कल्पना देणे मला आवश्यक वाटते. खरे तर, सर्व बुद्धिमान लोकांना याची जाणीव असेलच ; पण माझ्या दृष्टीने अडचणीची बाब म्हणजे ही समस्या इतकी गुंतागुंतीची आहे की त्यासंबंधी वर्तमानपत्रे आणि रेडिओ यांच्या माध्यमातून जनतेसमोर येणाऱ्या सर्व माहितीची गोळाबेरीज केली तरी सर्वसामान्य माणसाला या गंभीर परिस्थितीचे स्वच्छ आकलन होणे कठीण आहे. त्यापलीकडे, आपण जगाच्या समस्याग्रस्त भागांपासून खूपच दूर आहोत आणि समस्याग्रस्त लोकांची दीर्घकालीन दुर्दशा आणि तीवरील प्रतिक्रिया आणि त्या सर्वांचा त्यांच्या सरकारांवर होणारा परिणाम या सर्वांचे आपल्या राष्ट्रातील नागरिकांना आपण सुरू केलेल्या जागतिक शांतता स्थापनेच्या प्रयत्नांच्या संदर्भात आकलन होणे कठीण आहे.
युरोपच्या पुनर्वसनासाठी काय काय आवश्यक आहे याचा हिशोब करताना प्रत्यक्ष जीवितहानी; शहरे, कारखाने, खाणी, रेल्वेमार्ग अशा दृश्य नुकसानीचा अंदाज बरोबर काढला गेला आहे; पण गेल्या काही महिन्यांत सहजी असे दिसून आले की युरोपच्या अर्थव्यवस्थेचे जाळे विस्कळित झाल्याने जे नुकसान झाले आहे त्या मानाने या दृश्य विद्ध्वंसामुळे झालेले नुकसान कमी गंभीर आहे. गेल्या दहा वर्षांत परिस्थिती सातत्याने फारच अस्वाभाविक, विचित्र बनत गेली. तापाच्या धुंदीत असल्यासारखी केलेली युद्धाची तयारी आणि त्याहून अधिक धुंदीत केलेला युद्ध चालू ठेवण्याचा आटापिटा यांनी राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या सर्वच अंगांना ग्रहण लागले. यंत्रसामुग्री नादुरुस्त झाली किंवा दुरुस्तीपलीकडे