पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गेल्या सहा सात वर्षांपासून शेतकरी चळवळ आणखी एक नवीन भूमिका पार पाडीत आहे. जगभर समाजवादाचा ऐतिहासिक पाडाव झाला आहे; पण हिंदुस्थानात पुढारी, नोकरदार, समाजवादाच्या जमान्यामध्ये समृद्ध झालेले लायसन्स-परमिटांचे दलाल राजकारणी, गुंड, तस्कर अशा सर्वांनी सत्ता बळकावली आहे. इंग्रज आले त्या काळी या देशात ठगपेंढाऱ्यांची अनौपचारिक राजवट चालू होती; इंग्रज गेल्यानंतर पन्नास वर्षांत ठगपेंढाऱ्यांना आपली औपचारिक राजवट रूढ करणे साध्य झाले नाही. नेता, तस्कर, गुंडा, अफसर समाजवादाच्या जमान्यात हाती आलेली सत्ता सोडायला सुखासुखी तयार होणार नाहीत. उलट, 'येनकेन प्रकारेण' सरकारशाही व नोकरशाही यांचा अंमल चालूच रहावा यासाठी त्यांची प्रयत्नांची परकाष्ठा सुरू आहे; आणि सरकार व नोकरशाहीच्या प्रभुत्वाविरुद्ध संघर्ष उभा करण्याची महत्त्वाची भूमिका नवी शेतकरी चळवळ पार पाडत आहे.
 शेतकरी चळवळीने इतिहासातील एक कालचक्र पुरे केले आहे असे दिसते. या चळवळीची सुरुवात सरकार नावाच्या कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याने झाली. नंतर काही काळ या चळवळीच्या ज्वाला गावकुसाच्या आतच भडकत राहिल्या आणि तिने जमीनदार व सावकाराविरुद्ध संघर्षाचे रूप घेतले. स्वतंत्रता आंदोलनात राष्ट्रीय मध्यप्रवाहात तिने आपले अस्तित्व झोकून दिले. स्वातंत्र्यानंतर उत्पादन वाढविणे, सहकाराची जोपासना करणे अशी विधायक कामेही या चळवळीने केली आणि आता आपल्या आदिम स्वरूपात पुन्हा एकदा देशाच्या व्यासपीठावर उभी राहिली आहे. सरकारशाहीचा विरोध ही शेतकरी चळवळीची आद्य प्रेरणा होती. आज या चळवळीला आपल्या मूळ ओळखीची खूण सापडली आहे.

(शेतकरी संघटक, ६ नोव्हेंबर १९९७)

बळिचे राज्य येणार आहे / १९५