पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गाव आणि शहरे यांमधील संघर्षाचा उल्लेख मार्क्सच्या पुस्तकात सापडतो. टॉलस्टॉय, रस्किन इत्यादी लेखकांनीही या संघर्षाची मांडणी केली आहे. फ्रान्समध्ये तर 'एका बाजूला पॅरिस विरुद्ध उर्वरित देश दुसऱ्या बाजूला' अशी संघर्षरेषा मानली जाई. जेथे जातीव्यवस्था नव्हती तेथे हे भेद मिटत गेले. भारतात ना भांडवलवाद आला ना जातिवाद संपला आणि म्हणून या भेदाला 'भारत-इंडिया' संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी इथे आपला राजकीय जम बसविला तेव्हा भारतातील शेतकरी चळवळीने नवी दिशा धरली.
 इंग्रज येण्याआधी 'जात' हीच समाजघटकांची एकक होती. त्याबरोबरच 'गाव' हेही एकक होते. वेगवेगळ्या जातींतील संषर्घ कधी कधी उभे राहत; पण बाह्य आक्रमणाच्या भीतीने ते दबलेले राहात. रोजचा गावगाडा चालायचा म्हणजे शेतीभाती आणि बलुतेदारीची सर्व कामे पार पाडावीच लागत. गावचा कारभार आणि अधिकार सरदार, जमीनदार किंवा पाटील-पटवाऱ्यांच्या हाती असत हे खरे; पण त्या अधिकारांवर गावच्या सार्वजनिक हिताचे काही बंधनही असे. 'खाजगी मालकी' ही संकल्पनाच नव्हती. गावाच्या या रचनेमध्ये काही बदल करायची सुरुवात शेरशहाने पूर्वी केली होती. इंग्रजांनी आपली सत्ता प्रस्थापित करताना महसूल व्यवस्थेचे काम पूर्ण केले. देशभरातील सर्व जमिनींचे नकाशे बनवले, जमिनींना वेगवेगळे नंबर दिले. एकप्रकारे, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची मालकी व्यक्तीव्यक्तींवर खाजगी स्वरूपात जवळजवळ लादली गेली. परिणामतः, जमीन ही खाजगी मालमत्ता असू शकते अशी भावना, इतिहासात प्रथमच तयार झाली, 'अहम्'भाव ही प्राणिमात्राची मूलप्रेरणाच आहे. विचार करणारा एकक घटक 'व्यक्ती' असतो. त्यामुळे, 'खाजगी मालकी'ची संकल्पना निसर्गाशी बरीचशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे अल्पावधीतच तिने लोकांच्या मनाचा पगडा घेतला. अविकसित अवस्थेमुळे गावाच्या संस्कृतीत जी सामूहिकतेची भावना होती ती 'खाजगी मालकी'च्या संकल्पनेमुळे वेगाने लोप पावली.

 इंग्रजी राजवटीने जमिनीचा महसूल कठोर सक्तीने वसूल करण्याचा आणि करविण्याचा सपाटा सुरू केला. इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रदेशातला महसूल चौथ्या किंवा तिसऱ्या हिश्शापर्यंत आकारला होताच; पण जमीनदार, महसूल अधिकारी वसुलीचे काम अशा रीतीने करीत की त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनातील जवळजवळ दोन तृतीयांश उत्पादनाला मुकावे लागे.

बळिचे राज्य येणार आहे / १९१