पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दुष्काळाची झळ शेतकऱ्यांनाच का?



 प्रिय मोहनजी,
 सप्रेम नमस्कार
 विषय : महाराष्ट्रातील वारंवार पडणारा दुष्काळ कायम हटविण्यासाठी...


 वरील विषयावरील आपले ५ मे १९९२ चे पत्र मिळाले. वर्तमानपत्रांतील बातम्यांवरून, असेच पत्र आपण वेगवगळ्या राजकीय संघटना व राजकीय पक्षांचे नेते तसेच स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही पाठविले आहे असे कळते.

 महाराष्ट्रात सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी हलाखी झाली आहे. जनावरांना घालण्यासाठी चारासुद्धा दुरापास्त झाला आहे. काही किरकोळ अपवाद सोडता, माणसांचे भूकबळी कोठे होतील असा काही मोठा धोका दिसत नाही. 'भूकबळी म्हणजे पोटात घालायला अन्न सतत आठवडे आणि आठवडे मिळालेच नाही म्हणून येणारा मृत्यू' या अर्थाने भूकबळी होणार नाहीत ; पण कुपोषणामुळे येणारी शारीरिक कमजोरी आणि त्यामुळे होणारे व पसरणारे आजार लक्षात घेतले तर असे भूकबळी सुकाळाच्या वर्षीसुद्धा होतात; दुष्काळाच्या वर्षी अशा बळींची संख्या वाढेल, एवढेच काय ते ! पोटात घालायला काही मिळाले नाही म्हणजे काहीही वेडेवाकडे, अरबट चरबट भुकेलेला माणूस पोटात घालतो आणि त्यातून गॅस्ट्रोपासून ते विषबाधेपर्यंत अनेक आजार उद्भवून ते त्या बिचाऱ्याचा प्राण हिरावून घेऊ शकतात. असे भूकबळीही वर्षानुवर्षे घडत असतात, यंदाही घडतील.

बळिचे राज्य येणार आहे / १५७