पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माझा जन्म शेतकरी कुटुंबातला नाही. निदान पाच पिढ्यातरी माझ्या कुटुंबात कोणी शेती केली नाही. "शेतकऱ्यांविषयी करुणाभाव उपजून संयुक्त राष्ट्रसंघाची सुखासीन नोकरी सोडून हे हिंदुस्थानात आले." असे कोणी विधान केले तर ते मी तत्परतेने खोडून काढीत असे. "संयुक्त राष्ट्रसंघात परमोच्च पदापर्यंत बढती झाली असती तरी त्यापेक्षा संघटनेच्या कामात
  'दारिद्रयदुःखअपमानही प्राप्त झाले,
 कारागृही सतत वास करी जरी मी'
 तरी त्यात मला अधिक सार्थकता वाटेल" असे मी अनेकवेळा म्हटले आहे.
 "नेहरूप्रणीत समाजवादाच्या काळात सर्वच उद्योजकांवर अन्याय झाला; पण त्या सर्वांत भयानक जुलूम शेतकऱ्यांना सहन करावा लागला म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहायचे ठरवले." हेही मी वारंवार बोललो आहे.
 "शेतमजुरीचे दर शेतीमालाच्या भावापेक्षा अधिक गतीने वाढतात याची मला खात्री आहे; पण, शेतकऱ्यांनी शेतमजुरांना किमान दरानेही मजुरी देण्यात खळखळ केली तर मी शेतमजुरांच्या बाजूने शेतकऱ्यांविरुद्ध लढण्यास उभा राहीन," असे मी सुरुवातीपासून स्पष्ट केले आहे.
 थोडक्यात, मी जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलनाचे क्षेत्र निवडले; इतर बहुतेक नेत्यांप्रमाणे जन्माच्या अपघाताने किंवा परिस्थितीच्या रेट्याने डोक्यावर पडलेले कार्यक्षेत्र आपले म्हटले नाही याचाही मला अभिमान आहे.
 माझ्याविषयी लिहिताना कै. अरविंद वामन कुळकर्णी यांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला आहे. माझ्या विचारात श्रेय म्हणून मी न्याय, सुख, शांती अशी भाववाचक नामे वापरीत नाही. हे कुळकर्णी यांनी आवर्जून मांडले होते. अशा गुणवाचक शब्दांपेक्षा संख्यावाचक श्रेये ठेवणे माझ्या प्रकृतीला अधिक भावणारे आहे. सर्व श्रेयांत 'स्वातंत्र्य' ही संकल्पना संख्यावाचक आहे. तिची व्याख्या करताना मी स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या आणि चढत्या कक्षांची संकल्पना मांडली आहे.
 प्रत्येक व्यक्तीच्या जाणिवांचीही मी संख्यात्मक व्याख्या केली आहे. त्या जाणिवांच्या आधारे ॲडम स्मिथच्या 'Invisible Hand' चे विश्लेषण करून बाजारपेठेचे अध्यात्म उकलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच आधारे नेतृत्वगुणाचे अध्यात्मही तपासून पाहिले आहे.

 ७५ वर्षांचे समालोचन करताना माझ्या या आनंदयात्रेचा आठव कमी

बळिचे राज्य येणार आहे / १३७