पान:बलसागर (Balsagar).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हते, वाचले नव्हते; पण तेही येथे ऐकायला-वाचायला मिळाले. थोड्याच वेळात आसपासच्या काही मुसलमानी घरातूनही दगडफेक सुरू झाली. जालियनवाला बागेची आठवण व्हावी असे हे कोंडी करून निःशस्त्र जनतेवर हल्ला चढविण्याचे भ्याड कृत्य निदान काश्मिरातील पंडित समाज तरी कधीही विसरू शकणार नाही. कृती समितीच्या पत्रकात म्हटले आहे-
 "Bleeding wounds of men, women, boys and girls at the Rattan Rani Hospital are eloquent evidence of Kashmir's 'Jallianwala Bagh' enacted in the Shitalnath lane by the Kashmir Armed Police on 25th August."
 ..."It was a terrible, ghastly scene of premeditated massacre of peaceful unarmed people. About a thousand fell senseles or wounded, broken bones and widely bruised "...
 जखमेवर मीठ चोळावे तसा पुढचा प्रकार. जवळ जवळ हजारएक माणसे जखमी होऊन रस्त्यातच विव्हळत, कण्हत पडली; कुणाच्या बरगड्या मोडलेल्या, बहुतेकांची डोकी फुटलेली, कुणाचे हात, कुणाचे पाय - तरी एकालाही सरकारी इस्पितळात प्रवेश मिळाला नाही. प्रवेश नाकारण्यातच आला. वाहनांची सोय तर नाहीच. १५ ऑगस्टच्या रीगल चौकातील हल्ल्यानंतर जखमींच्या बाबतीत हाच हेतुपुरस्सर पक्षपात केला गेला होता. त्याची पुन्हा पुनरावृत्ती. रेडक्रॉस ही तर मानवतावादी, आंतरराष्ट्रीय संस्था ना ? पण तीही दडपणाखाली होती. १५ ऑगस्टला व २५ ऑगस्टलाही जखमींच्या शुश्रूषेला तिनेही नकार दर्शविला. एकीकडे वृत्तपत्रांची तोंडे बंद करण्यात आली होती, दुसरीकडे रेडक्रॉससारख्या स्वतंत्र सेवा संस्थाही वश करून घेण्यात आल्या होत्या. किती किती मार्गानी पंडितांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी काश्मिर पोलीस व त्यांचे मंत्रिमंडळातीत पाठीराखे गट प्रयत्न करीत होते आणि सादिकसाहेब किती असहाय्यपणे हे सारे पाहत राहिले होते, याचा यापेक्षा अधिक पुरावा काय हवा ? शेवटी रतनराणी या एका खाजगी दवाखान्यात जखमींना हलविण्यात आले - दवाखाना कसला? एका डॉक्टरचे दुमजली घरच ते. कसल्या खाटा आणि कसले वॉर्डस् ? जागा मिळेल तेथे, व्हरांड्यात, आवारात, कसल्यातरी चिरगुटावर असंख्य जखमी विव्हळत पडले होते आणि मिळेल तो उपचार करून घेत होते.
 जखमींचा त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेला तपशील असा-

पुरुष ११७७
स्रिया २९२
मुले ३५३
एकूण १८२२
।। बलसागर।। ४२