पान:बलसागर (Balsagar).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जशी पुढे पुढे सरकते, तसतसे नवे कार्यकर्ते आणि नेते यांचीही तिला कधी वाण पडत नाही. मात्र चळवळ म्हणजे कृत्रिम प्रक्षोभ किंवा केवळ भडकवाभडकी असता कामा नये. जनतेच्या जीवाभावाला ती खरोखरच स्पर्श करणारी असली पाहिजे. पंडित समाजाने गेल्या वीस वर्षांत काश्मिरमध्ये, त्यांच्या हक्काच्या घरामध्ये खरोखरच खूप सोसले होते, सर्व क्षेत्रातील जुलुम आणि पक्षपात मान खाली घालून सहन केला होता. या समाजाची काश्मिरातील संख्यात्मक ताकद ती किती ? शेकडा एक टक्का देखील नाही. तरीपण अन्याय जिव्हारी झोंबला असेल तर एवढी लहानशी आणि कुठल्याही क्षणी सहज चिरडून टाकता येण्याइतकी किरकोळ संख्याही केवढा प्रखर आणि तेजस्वी प्रतिकार करू शकते याचे हे एक अनुकरणीय उदाहरणच येथे घडत होते.
 ज्या ठिकाणी आंदोलन समितीची मुख्य कचेरी होती ते शीतलनाथ मंदिर व त्या सभोवतालचे आवार काही फारसे मोठे नव्हते. एकीकडे कचेरीबाहेर आवारात गर्दी वाढतच होती आणि दुसरीकडे त्या दिवशीच्या पाच जणांच्या तुकडीच्या सत्याग्रह कार्यक्रमाची जमवाजमवही सुरू होती. आदल्या दिवशीच्या व रात्रीच्या घरपकडीचा व अत्याचारांचा निषेध व सत्याग्रही तुकडीला निरोप, यासाठी दुपारी दीडला आवारातच सभा योजली होती. आवाराकडे येणा-या सर्व वाटा अगदी अरुंद व एका बाजूला तर घाण पाण्याचे डबके! सभेला लोकांनी जाऊ नये म्हणून सर्व वाटा पोलिसांनी अडवलेल्या होत्या. तरी लहान मुले, स्त्रिया, म्हातारी माणसेदेखील सभेला लोटतच होती. समोरच्या डबक्यातूनही काही उत्साही तरूण पोहून सभास्थानी येत होते. यावरून एकदर वातावरणाची सहज कल्पना येऊ शकते. सभा सुरू झाली आणि सहस्रसहस्र मुखातून घोषणा दिल्या जात होत्या-'हिंदुस्थान झिदाबाद, हिंदु-मुस्लिम युनिटी झिंदाबाद, परमेश्वरीको छोड़ दो...' तीन-साडेतीनच्या सुमारास सभा संपली, सत्याग्रही तुकडी अटक करून घेण्यासाठी नियोजित स्थळाकडे निघालो, लोकही त्यांच्या मागोमाग लोटले आणि आता पोलिसांनी या पाचजणाना मोटारीतून घालन घेऊन जायचे! गेल्या वीस दिवसांचा हा ठरलेला कार्यक्रम होता. पण या वेळी भलतेच झाले. सत्याग्रहींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी बेदम मारझोडीला एकदम सुरुवातच केली. अनपेक्षित, अकल्पित, अचानक. सर्व रस्ते रोखले गेले होते. एकच वाट-तीही अगदी अरुंद-बाहेर पडण्यासाठी मोकळी ठेवण्यात आली होती आणि जवळजवळ तीस-चाळीस हजारांचा जनसमुदाय - लहान मुले, स्रिया, तरुण विद्यार्थी - विद्यार्थिनी, म्हातारेकोतारे. पोलिसांनी पुरी कोंडी केली आणि हत्यार चालू केले. लाठीहल्ला आणि अश्रुधूर तर खरेच; पण पोलिसांनी दगडफेक करावी! हे कधी ऐकले

।। बलसागर ।। ४१