पान:बलसागर (Balsagar).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारत आणि चीनचे शत्रुत्व आणि पाकिस्तान-चीनची युती. तरीही अमेरिकेची मदत (शस्त्रास्त्रांची व इतरही) भारतापेक्षा पाकिस्तानला अद्यापही जास्तचीन आणि अमेरिका यांचे हाडवैर असताना. व्हिएटनामविषयी शास्त्रीजींनी वक्तव्य केले. जॉन्सन सोडाच, त्याचा परराष्ट्रमंत्री डीन रस्क यानेसुद्धा ‘मूर्खाची बडबड' यापेक्षा त्याला अधिक किंमत दिली नाही. ही झाली अमेरिकेतील आमची प्रतिष्ठा. रशियाने कच्छबाबत आपली भूमिका मानली का ? शास्त्रीजींचे भरघोस स्वागत केले. पण कच्छबाबत मौन. आफ्रिकेत तर आपल्याला अद्याप स्थानच नाही. आशियातील स्थान चीनने आक्रमण करून केव्हाच हिरावून नेले. एकूणएक भारतीयांची बिनदिक्कत हकालपट्टी करणाऱ्या लंगोटीएवढ्या ब्रह्मदेशाला आपला धाक नाही, तर आम्ही प्रतिष्ठेच्या गोष्टी काय बोलाव्यात ! उलट आजवर अनुभव असा आहे की, 'मारका बैल' म्हणून जरी पाकिस्तान जगात ओळखले जात असले तरी त्याचीच कड सर्वांनी भारतापेक्षा अधिक घेतली आहे. काश्मिरबाबत तर भारताची भूमिका जगात कोणालाही मान्य होत नाही. आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत पाकिस्तानपेक्षा कमी, संघर्षाचे वेळी पाकिस्तानकडे सहानुभूती, अशी अवस्था असताना, ' आमची जगातील प्रतिष्ठा मोठी' या म्हणण्याला पुरावा काय ?
 उलट पुरावा येथे पाहा. इंग्लंडचे भारतातील सध्याचे वकील फ्रीमन हे वकील म्हणून या ठिकाणी येण्यापूर्वी ' New Statesman' या समाजवादी विचारसरणीच्या, इंग्लंडमध्ये भारदस्त व वजनदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ताहिकाचे संपादक होते. फ्रीमन हे पं. नेहरूंचे चाहते, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा फ्रीमन व त्यांचे स्टेट्समनपत्र यांनी जोरदार पुरस्कार केलेला. किंग्सले मार्टिन हे पं. नेहरूंचे असेच मित्र, चाहते, त्यांच्या ध्येयधोरणांशी सहमत असलेले, भारताविषयी आपुलकी बाळगणारे, स्टेट्समनपत्राच्या संपादक मंडळातील आणखी एक नामांकित पत्रकार. इतकी सारी मानसिक अनुकूलता असतानादेखील हे वजनदार पत्र व विशेषतः किंग्सले मार्टिन कच्छबाबत भारताची बाजू मानायला तयार नाहीत. त्यांच्या हिशेबी भारत आणि पाकिस्तान सारखेच. 'न्यू स्टेट्समन' मधील त्यांच्या लेखातील या १-२ उताऱ्यांवरून त्यांच्या हिशेबी आमची नैतिकता आणि पाकिस्तानची दांडगाई सारखीच असल्याचे कळून येते. ३० एप्रिल १९६५ या अंकात ते लिहितात-

 "We are not living in a sane world. Fighting ( in Kutch ) has broken out on a considerable scale; both sides ( India and Pakistan) are massing troops and arms. The press and radio propaganda, both in Delhi and Karachi, is of a kind only too familiar in Europe : 'Our troops are defenders of our frontiers

।। बलसागर ।। १२ ।