पान:बलसागर (Balsagar).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घरे असतील ! पोटभर अन्नही मिळत नाही. अन्न मिळाले तर ते निकृष्ट असते ही किती दु:खाची गोष्ट आहे ! हे आपण कसे बदलणार ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही आर्थिक क्रांती कशी होईल? अमची खेडी कशी बदलतील ?...संस्कृतीच्या बाबतीत आपण अधिकारी आहात. धर्म व परंपरेच्या बाबतीत आपण विचार करता व त्यामुळे सांगण्याचा अधिकार आहे म्हणून आपण हे काम करू शकता. माझी तुम्हाला तशी विनंती आहे. आपल्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे. जेथे ब्राह्मण व हरिजन भाऊभाऊ आहेत, एकमेकांना जेथे आम्ही आलिंगन देऊ शकू, जेथे गरीब व श्रीमंत हा भेद मिटवता येईल, जेथे शासन प्रत्यक्ष जनतेच्या हाती जाऊ शकेल असा देश आम्ही पाहू इच्छितो. हे शक्य आहे. हे काही स्वप्न नव्हे...हे आपल्याच हातून घडेल. मी आपली स्तुती करीत नाही. वस्तुस्थितीच अशी आहे म्हणून हे सांगतो तुमचा विचार फार दूरपर्यंत जाईल. तुमच्या मागे ब्राह्मणत्वाची शक्ती आहे. आज वर्तमानकाळात जे परिवर्तन घडत आहे त्या परिवर्तनकार्यातही आपणच अग्रणी आहात. ती शक्ती आपल्याबरोबर आहे."... (पाटण, ३ नोव्हेबर ७७ संघ-शिबिरातील भाषण)

 दीनदयाळ उपाध्याय म्हणजे तर चालता बोलता, मूर्तिमंत संघ ! संघाला अभिप्रेत असणाऱ्या मानवतेची सगुण-साकार प्रतिमा 'अखंड भारत' या संघाच्या मूळ उद्दिष्टावरील दृष्टी जराही ढळू न देता त्यांनी ते गाठण्याचा मार्ग मात्र पुढील शब्दात विशद केलेला आहे. भाषा वेगळी, विचार एक असे दीनदयाळ आणि जयप्रकाश यांची अवतरणे शेजारीशेजारी ठेवल्यावर कोणालाही वाटल्या वाचून राहणार नाही. दीनदयाळजी म्हणतात-

 "हे दीन, दरिद्री अडाणी आमच्याकरिता नारायणस्वरूप आहेत. आम्हाला त्यांची पूजा करावयाची आहे. हा आमचा सामाजिक आणि मानवधर्म आहे. ज्या दिवशी यांना पक्की, सुंदर व स्वस्त घरे आपण देऊ, ज्या दिवशी यांच्या मुलांना आणि स्त्रियांना शिक्षण आणि जीवनदर्शन देऊ, ज्या दिवशी त्यांना उद्योग आणि धंद्याचे शिक्षण देऊन आपण त्यांचे उत्पन्न वाढवू, त्या दिवशी आमचे बंधुप्रेम प्रकट होईल. खेड्यांमध्ये आज काळ अचल उभा आहे. तेथे आईबाप आपल्या मुलांचे भविष्य बनविण्यास असमर्थ आहेत. त्या ठिकाणी जोपर्यंत आपण आशेचा आणि पुरुषार्थाचा संदेश पोहचवू शकणार नाही तोपर्यंत आपण राष्ट्राचे चैतन्य जागृत करू शकणार नाही. आमच्या श्रद्धेचे केंद्र, आमचे आराध्य आणि उपास्य, आमच्या पराक्रमाचे आणि प्रयत्नांचे उपकरण आणि आमच्या संपन्नतेचा मानदंड तो मानव आहे, जो आज अक्षरशः अनिकेत आणि अपरिग्रही आहे. जेव्हा त्या मानवाला पुरुषार्थचतुष्टयशील बनवून उत्कर्षाचा

।। बलसागर ।। १४१