पान:बलसागर (Balsagar).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिला होता. ते सतत विकसित होणारे, प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारे एक ओजपूर्ण जीवन होते. नेहरू पूर्णमानव नव्हते. त्यांना तसे होणे कदाचित आवडलेही नसते. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्यातच धन्यता मानणारे ते एक श्रेष्ठ मानवी जीवन होते.
 वर दिलेल्या जिलासच्या अवतरणातील अखेरचा भाग पंडितजींना जेवढा लागू पडतो, तेवढा त्यांच्या समकालीनात इतर कोणासही लागू पडत नाही. पंडितजींची अनेक धोरणे फसली; त्यांची शत्रुमित्रपारख चुकली; त्यांचे अनेक निर्णय इतिहासाने निखालस चुकीचे ठरविले. हे सर्व जरी सत्य असले, तरी 'मूलभूत नीतिमूल्यांची योग्य ती कदर ठेवून ते आपल्या ध्येयाकडे निश्चित वाटचाल करीत होते,' यात तिळमात्र शंका नाही. यश व निश्चित फलप्राप्ती हा एकच निकष मानला, तर पंडितजींचा वारसा इतरांच्या तुलनेने कदाचित कमी भासेल; पण राजकारणाच्या कलहसष्टीत वावरत असतानाही त्यांनी बाळगलेले नैतिकतेचे भान हा त्यांनी मागे ठेवलेला फार मोठा वारसा आहे-प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा असा. नेहरूंच्या भारतीयत्वाचा, हिंदुत्वाचा हा अस्सल अंश होता, असे म्हटले तरी चालेल. हा अंश, हे भान विसरा आणि रामायण-महाभारतात किंवा एकूणच भारतीय संस्कृतीत काय शिल्लक उरते ते पाहा. जणू हा महाभारतकालीन धर्मराजच नव्या रूपाने आधुनिक काळात वावरत होता.
 या धर्मराजास, या आधनिक राजर्षीस सहस्र प्रणाम.


मे १९६५

।। बलसागर ।। ८