सुसंस्कृत राजकारणी : यशवंतराव चव्हाण
सामान्यातून असामान्य झालेल्या परंतु सतत सामान्यांची काळजी वाहणारा लोकनेता म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्व कालातीत आहे. या नावाशी माझी पहिली ओळख झाली तेव्हा मी कोल्हापूर आर्य समाजाने चालविलेल्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत इयत्ता ५वीत शिकत होतो. त्या वेळी बहधा शिक्षण तोंडी असायचं. गुरुजींचा ठरलेला प्रश्न असायचा... नव्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण? सारा वर्ग त्यांनीच पाठ करून घेतलेलं उत्तर एका स्वरात द्यायचा... यशवंतरावऽऽ चव्हाण! पुढे दोन एक वर्षांतच ते मी शिकत, राहात असलेल्या रिमांड होममध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या समवेत आले... त्यांच्यापुढे कार्यक्रमाशेवटी जवळ उभारून राष्ट्रगीत म्हणण्याची संधी मिळणार होती. पण उंचीनी घात केला नि मी मोठा म्हणून मला बाजूला करण्यात आलं. पण तासभर आम्ही त्यांच्याजवळ होतो. बालपणात त्यांच्याबद्दल निर्माण झालेले कुतूहल वय वाढेल तसं वाढतच गेलं. ते या जन्मशताब्दी वर्षांपर्यंत वाढतच आहे. कधी मुत्सद्दी म्हणून, कधी मवाळ म्हणून, कधी वादग्रस्त झाले म्हणून ते माझ्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिले. महाराष्ट्राच्या पुरोगामी चरित्राची त्यांनी केलेली जडण घडण, सामान्याच्या हाती सत्ता यावी म्हणून त्यांनी केलेला पंचायत राज्याचा प्रयोग (जो आज राष्ट्रभर राबवला जातोय!), साहित्य, संस्कृती, कला, संगीताबद्दल त्यांचं सहज प्रेम अशा अनेक कारणांनी मी त्यांच्याकडे ओढला गेलो. सन १९८५ मध्ये मी त्यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ' वाचलं नि