पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मुबलक रॉकेल मिळू लागले.

 चंद्रकांतवर नागरिकांनी पत्र लिहून वा भेटून अभिनंदनाचा वर्षाव केला.

 चंद्रकांतचं धाड सत्र अधिक वेगानं चालू राहिले. ते अर्थातच राजकारणी व एजंटाच्या अभद्र युतीस पचनी पडणं शक्यच नव्हतं.

 बद्रीप्रसादच्या प्रकरणानंतर तीनच महिन्यांनी चंद्रकांतची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि काही काळातच 'येरे माझ्या मागल्या' परिस्थिती आली.

 चंद्रकांत बदलीच्या जागी रुजू होण्यासाठी जाताना इनसायडरपुढे आपलं मन मोकळं करताना म्हणाला,

 'मित्रा, बदलीचे काही वाटत नाही; पण अवघ्या पाच महिन्यात बदली व्हावी- तीही कठोरपणे कर्तव्यपालन केलं म्हणून? ही तर चांगलं काम केलं म्हणून पनिशमेंट झाली. मी यातून काय अर्थ काढावा? आजवर बद्रीप्रसादसारख्यांशी समझोता करून सुखेनैव काम करणारे अनेक पुरवठा अधिकारी होऊन गेलेच की! मी हा जो काही अट्टाहास केला तो कशासाठी? ज्या गोरगरिबांची चूल त्याविना पेटत नाही, ते रॉकेल त्यांना योग्य दरात नियमित मिळावे म्हणून ना? मग का नाही माझ्यामागे त्या जनतेचं किंवा माझ्या वरिष्ठाचं बळ उभं राहिलं? अजून माझी जिद्द कायम आहे. मी हिंमत नाही हरलो; पण असेच दोन-चार अनुभव पुढे आले तर कदाचित मीही प्रवाहपतित होण्याचा धोका आहेच ना? ती कोणाची हार असणार आहे? माझी, का प्रशासनाची ?"

 चंद्रकांतला दिलासा देण्यासाठी इनसायडरजवळ शब्द नव्हते; चंद्रकांत म्हणत होता, 'हेचि फल काय मम तपाला?'

 इनसायडरनं या संदर्भात एक पत्र सर्व वृत्तपत्रांना पाठवलं. ते केवळ हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेत्यांनी चालवलेल्या स्वतंत्र विचारसरणीच्या जिल्हापत्रात तेवढं छापून आलं, त्यात इनसायडरनी या प्रकरणाचा बोध काय हे सांगताना लिहिलं होतं,

 ‘प्रत्येक प्रशासकानं आपणं काम चोख करावं हे अपेक्षित आहे. त्या साठीच त्याला जनतेच्या करातून जमा होणाऱ्या पैशातून पगार व पर्स दिले जातात. चंद्रकांतनं फार कांही जगावेगळं केलं असं मी म्हणणार नाही. त्यानं आपलं कर्तव्य चोख बजावलं. पण तोच त्याचा अपराध ठरावा व त्याची तडकाफडकी बदली व्हावी ही शोकांतिका म्हणायला हवी. पण त्याचे समाजमनाला भान आहे का?'

प्रशासननामा । ८१