पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंधरा-वीस वर्षाचा इतिहास होता.

 यात भर पडली ती इराकनं कुवेतचा कब्जा करून भडकवलेल्या गल्फ युद्धाची. भारताचा तेलपुरवठा विसकळीत झाल्यामुळे टंचाई वाढली होती. त्याचा परिणाम या शहरावर अधिक झाला होता. मुळातच काळाबाजारवाले व राजकारणी धंदेवाईकांची भ्रष्ट युती व रॉकेल धंद्यातील प्रचंड ‘ऑन मनी' मुळे नित्य टंचाई निर्माण करणे हा या युतीचा हातखंडा प्रयोग होता. त्या आगीत गल्फ वॉरच्या निमित्तानं अपु-या रॉकेल पुरवठ्याचं तेल पडलं आणि रॉकेल टंचाईनं भीषण रूप धारण केलं!

 या पार्श्वभूमीवर चंद्रकांतनं पदभार स्वीकारल्यावर तडफेनं कामास प्रारंभ केला. प्रथम स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या व दररोज स्वत: हिंडून तपासणी करणं व अकस्मात धाडी घालणं सुरू केलं; पण टंचाईचे खरे सूत्रभार हे बडे रॉकेल एजंट आहेत हे त्याला माहीत होतं; पण ते स्वत: नामानिराळे राहून ते सब एजंट व किरकोळ विक्रेत्यांकडून काळाबाजार करतात हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य होतं आणि त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करता येत नव्हती व वेसण घालता येत नव्हती.

 अचानक त्याला 'जनसुनवाई' ची कल्पना सुचली. राजस्थानमध्ये गावकरी एकत्र येऊन अधिकारी-पुढाऱ्यांना ‘जनसुनवाई' च्या माध्यमातून जाब विचारतात, असं त्यानं वृत्तपत्रांतून वाचलं होतं. या कल्पनेचा उपयोग करून घेण्याचं त्यानं ठरवलं आणि वार्ताहर परिषद घेऊन, रॉकेल टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे पुढाकार घेत ‘जनसुनवाई' कार्यक्रम घेण्याचे जाहीर केलं. शहरातील नागरिकांनी प्रश्न बंद पेटीत टाकावेत. काही गुप्त बातमी-रॉकेलच्या काळाबाजाराच्या संदर्भात असेल तर तीही या पेटीत टाकावी. कार्यक्रमातून त्यावर कार्यवाही करून सभेमध्ये अहवाल दिला जाईल, असं त्यानं जाहीर केलं.

 ‘जनसुनवाई' चा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला. कारण बंद पेटीत नागरिकांनी ज्या खबरी दिल्या होत्या, त्याबाबत चंद्रकातनं कार्यवाही करून एक सबएजंट व तीन स्वस्त धान्य दुकानांवर धाडी घालून त्यांचा रॉकेलचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता आणि त्यांचे परवाने रद्द केले होते. या ‘जनसुनवाई' साठी तेल कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी व शहरातील सर्व ठोक एजंट व सब एजंट यांना उपस्थित राहणे चंद्रकांतनं सक्तीचे केले होते. हेतू हाच की, त्यांना नागरिकांच्या रोषाची जाणीव व्हावी आणि त्यांनी स्वत:हून गैरव्यवहार थांबवावा!

 आणि आज एक वृद्ध गृहस्थ फोनवर ‘जनसुनवाई' चा संदर्भ देत काही बातमी देऊ इच्छित होता.

७६ । प्रशासननामा