पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातच या लॉबीचं हित सुरक्षित आहे.

 हीच बाब टँकर लॉबीची आहे. त्यात भर पडली ती दूध संघाची. त्यांच्याजवळही दुधाचे बरेच टॅकर्स असतात व मार्चनंतर दूध कमी होऊ लागते, तसे ते रिकामे राहतात. या टँकर्स व रिग मशिनला काम मिळावं, ज्यात मोठे भांडवल गुंतवलेले असते, म्हणून लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असणाऱ्या त्यांच्या लॉबीचे प्रशासनावर दडपण येते. गरज नसताना जादा टँकर्स लावणे व अधिकाधिक कूपनलिका खोदणे हे प्रकार सुरू होतात. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी अधिक खाली जाते. नजीकच्या भविष्यात अशी पाळी येणार आहे की, कूपनलिका कितीही खोदल्या तरी पाणी लागणार नाही. बागायती शेती खर्चिक, न परवडणारी आजच झाली आहे. उद्या काय होईल या प्रश्नानं अस्वस्थ व्हायला होतं!

 बागायत हे प्रवाही वा विहीर सिंचनानं व्हावे, हा आदर्श जलव्यवस्थापनाचा मंत्र आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. बोअरद्वारे सिंचन हा प्रकार भूगर्भातील पाणी जलदगतीनं संपवून टाकेल, मग काय? या सवालाकडे कुणालाही लक्ष द्यायला फुरसद नाही. एवढा स्वार्थ या प्रश्नी एकवटला गेला आहे.

 वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण आणि परदेशी जीवनशैलीचा आदर्श यामुळे उच्चभ्रूचा पाण्याचा वापर वाढत आहे; तसेच जलसिंचनाच्या वाढत्या गरजा व शेतीसाठी पाण्याची वाढती मागणी. शतकानंतर पाण्यासाठी मारामारीच काय; पण युद्धे पण होऊ लागतील. पाण्याची पातळी वाढणाच्या पर्यावरणीय योजना. 'पाणी अडवा - पाणी जिरवा' यासारखे स्थानिक कार्यक्रम, लोकांचा सहभाग, प्रबोधन आणि पाणी समवाटपासाठी कायदे, असे अनेक उपाय तज्ज्ञ सुचवतात.

 पण टाकळीसारखे पाणी पेटविण्याचे प्रयत्न आणि टंचाई प्रशासनाला सतावणाऱ्या टँकर्स आणि रिग मशिन लॉबी कमी होतील तो सुदिन.

 आणि त्याचबरोबर खानोलकरांसारख्या सक्षम अधिकाऱ्यांमागे प्रशासनाने आपले बळ उभे करणे आणि त्यांना हिंमत देणे हेसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच केले पाहिजे.

 पण लक्षात कोण घेतो? कोण घेणार? कोण घेईल?

५० । प्रशासननामा