पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्ही हनुमान भक्त मंडळ स्थापन करू. पण काही झालं तरी हे मंदिर हलवायला आमचा ठाम विरोध आहे.'

 'जरा विचार करा, रस्त्याची शहराला केवढी गरज आहे! पावसाळ्यात अक्षरश: चिखलातून तुम्हीं लोक जा-ये करता. नदीला जराही पूर आला की कसबा व पेठेचा संपर्क तुटतो. अरुंद रस्त्यामुळे एक मोठा ट्रक आला की तासन्तास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आपला हा आग्रह अनुचित आहे. मी तुम्हाला पर्याय देतो. हे मंदिर नगरपालिका कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या कट्टयावर स्थलांतरित करू. हवं तर तेथे तुम्ही छोटंसं मखर उभारून त्याला मंदिराचा आकार द्या. त्यासाठी मी मदत करीन, पण हे काम अडवणं योग्य होणार नाही.'

 पण हिंदू समाजाची नेते मंडळी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे चर्चा वांझोटी ठरली.

 चंद्रकांत आपल्या कार्यालयात येऊन बसला. आणि विचार करू लागला. ‘अशा परिस्थितीत आपले राजासाहेब असते तर त्यांनी काय केले असते? कोणती नवी प्रशासकीय गुरुकिल्ली त्यांनी चालविली असती?'

 चंद्रकांतनं स्वत:ला प्रश्न केला आणि बऱ्याच विचाराअंती त्याला उत्तर गवसत गेलं.

 त्या रात्री त्याने पोलीस बंदोबस्तात दोन्ही बाजूंनी रस्ते कामासाठी म्हणून बंद केल्याचे दर्शवीत कुणाला कळू न देता ते रस्त्यावरचे उघडे मंदिर हटविले. साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करीत ते नगर परिषद कार्यालयाच्या भिंतीबाहेरील कट्टयावर स्थलांतरित केले. त्यावर झटपट छोटे देवालय मखरासह बांधून काढले. या साऱ्याचं त्यानं आठवणीने व्हिडिओ शूटिंग करवून घेतले आणि एका पुजाऱ्याच्या हस्ते पूजा घडवून आणली. याची शहरवासीयांना यत्किंचितही चाहूल त्या रात्री लागली नाही. मंदिर स्थलांतरित करून तो रस्त्याचा भाग, यापुढे जवळपास शंभर मीटर, रात्रीतूनच डांबरी करून टाकला.

 सकाळी शहरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. विरोध करणारी हिंदू नेते मंडळी संतप्त झाली होती. त्यांनी शहर बंद ठेवण्याचे जाहीर केले. एक मोर्चा काढला. प्रशासनाचा निषेध करणारे निवेदन दिले. मंदिर पुन्हा रस्त्याच्या मध्यभागी वाहतूक बेटासह उभारण्याचा पुनरुच्चार केला. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

 चंद्रकांतने शांतपणे ते शक्य नाही, असे सांगितले.

 तसा एक जहाल नेता आवेशाने म्हणाला,

३० । प्रशासननामा