पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रस्ता कसबा विभागला स्पर्शून जात होता. त्यामुळे धुळीचा, कच्चा व अरुंद रस्ता ही शहराची सर्वांत मोठी समस्या होती.

 कसबी व पेठ भाग जोडणारा प्रमुख रस्ता आणि फरशी पुलाचे पक्क्या पुलात रूपांतर करण्याची योजना चंद्रकांतने आखली. आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी रक्कम मंजूर करून घेतली. बांधकाम विभागामार्फत ज्या दिवशी प्रत्यक्षात डांबरी रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा सगळ्या शहरात आनंदोत्सव साजरा केला गेला.

 काम सुरू झाले, त्याच्या तिसऱ्याच दिवशी बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रकांतकडे आले, आणि म्हणाले,

 ‘सर, एक समस्या उद्भवली आहे. नगरपालिका कार्यालयासमोर रस्त्याच्या मध्यभागी मारुतीचं एक छोटं, चौथाऱ्यावरचं उघडं मंदिर आहे. ते हलवायला हिंदू समाजाचा विरोध आहे. त्यामुळे काम बंद पडलंय.'

 रस्त्याचे काम मंजूर करून घेताना चंद्रकांतने ही समस्या जाणून नगराध्यक्ष व इतर नेत्यांशी चर्चाही केली होती. त्यांनी रस्त्याचे काम होणार असेल तर मंदिर हलवता येईल असे आश्वासन दिलं होतं. पण प्रत्यक्षात ती वेळ आली तेव्हा नगराध्यक्ष मुंबईला काहीतरी ग्रँटचे काम काढून गेले, तर इतर काही नेते मंडळी मूग गिळून चूप होती. काही धार्मिक नेत्यांनी हिंदूंच्या भावना दुखावत असल्यामुळे मंदिर न हलवता तेथे वाहतूक बेट (आयलंड) करून रस्ता पुढे न्यावा अशी मागणी केली. आणि हिंदू समाजाची धार्मिक भावना फुलवीत काम बंद पाडलं.

 चंद्रकांत तातडीने तेथे गेला. उपस्थित झालेल्या नेत्यांना म्हणाला, 'हे पहा, रस्ता अत्यंत अरुंद आहे, त्यामुळे इथे वाहतूक बेट करणे शक्य नाही. रस्ता होईल तेवढा रुंद करण्याचा माझा प्रयत्न आहे. दुतर्फा असलेल्या दुकानांचे कट्टेही काढायला सुरुवात केली आहे.'

 ‘पण साहेब, हनुमान ही ग्रामदेवता आहे.'

 ‘तिचं मंदिर तर बाजारपेठेत आहे.'

 चंद्रकांत समोरच्या उघड्या कड्यावरील शेंदूर फासलेल्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाला,

 'हे काय मंदिर आहे? हे पहा - इथे कुत्र्यामांजरांनी लघवी केल्याच्या खुणा दिसतात.'

 तावातावानं बोलणारा पुढारी नरमला.

 ‘यापुढे आम्ही मंदिराच्या पावित्र्याची, रक्षणाची जबाबदारी घेऊ. त्यासाठी

प्रशासननामा । २९