पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


देशाला वाचविण्यासाठी
(महाराष्ट्र विधानसभा निवडणुका १९९५)


 हाराष्ट्राचा दौरा करायला लागलो, की एक नेहमी जाणवते, आता निवडणुकीच्या हंगामात तर ते विशेषत्वाने जाणवते. या वेळी पुण्याहून दौरा सुरू केला. पुणे म्हणजे पवारांचे राज्य. पुण्याहून कोल्हापूरला आलो, तिथं वसंतदादा आणि त्यांच्या कंपनीचं राज्य. तिथून सोलापूरला आलो तिथं शिंद्यांचं- मोहिते पाटलांचं राज्य. तिथून लातूरमध्ये आले तर तिथं कोणा एका शिवराज पाटलांचं किंवा विलासरावांचं राज्य. पुढे नांदेडला आलो, तर तिथं शंकररावांचं राज्य. विदर्भात यवतमाळमध्ये शिरावं, तर नाईकांचं राज्य. नाशकात जावं तर हिऱ्यांचं. जळगावात जैनांचं, तर धुळ्यात आणखी कोणाचं राज्य! महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात किंवा विभागात पाहावं तर कोणाचं ना कोणाचं तरी राज्य असल्याची जाणीव होते.

 एकेकाळी संपूर्ण देशामध्ये संस्थानंच संस्थानं झाली होती, ती संस्थानं विलीन करून सरदार वल्लभभाई पटेलांनी एक देश तयार केला. जुनी संस्थानं गेली आणि गेल्या सत्तेचाळीस वर्षांत नवी संस्थानं तयार झाली. अजून तरी या नवीन संस्थानांमध्ये नव्या संस्थानिकांना जुन्या संस्थानिकांइतकं प्रेम लाभलेलं दिसत नाही आणि प्रत्येक संस्थानांचं वैशिष्ट्य असं, की तिथले लोक स्वतंत्र आहेत असंही नाही. जिथं शेतकरी संघटनेसारख्या संघटनेच्या सभेला लोक समोर येऊन बसायलासुद्धा घाबरतात. ऐकायचं तर असतं, मग कुठंतरी दूर कोपऱ्यात बसून ऐकतात. शरद जोशींच्या सभेला आपण पुढे जाऊन बसलो, असं जर का कुणा भाऊसाहेबांना, काकासाहेबांना, मामासाहेबांना कळलं, तर ते आपल्याला बोलावून काय प्रश्न विचारतील याच्या धास्तीने लोक सभेला समोर येत नाहीत, असं या प्रत्येक संस्थानातलं वातावरण आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / ९२