दोन अधिक दोन
दिल्लीत सगळ्यांच्या तोंडी असलेला एक किस्सा चालू :
पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या नातीने (का पणतीने) विचारले, "आजोबा, दोन अधिक दोन किती " रावसाहेबांनी उत्तर दिले, "बाळ, हा प्रश्न मोठा महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. घाईघाईने त्याचे उत्तर देणे चुकीचे होईल. या प्रश्नाचा सर्वांगाने आणि साकल्याने विचार करावा लागेल. निर्णय घेताना विरोधी पक्षांनासुद्धा आपल्या बरोबर घेऊन चालले पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशीही सल्लामसलत करून, याचे उत्तर द्यावे लागेल. उत्तर शेवटी सर्वमान्य असले पाहिजे. वेगवेगळी मते लक्षात घेऊन, मधला मार्ग स्वीकारणे श्रेयस्कर होईल."
पंतप्रधानांच्या नातीने (किंवा पणतीने) काय उत्तर दिले असेल कुणास ठाऊक! ती बिचारी निमूटपणे घरातील दुसऱ्या कोण्या कमी विद्वान माणसाकडे गृहपाठातील अडचण सोडवून घेण्यास गेली असेल. देशातील जनता तसे करू शकली असती, तर किती बरे झाले असते! दुर्दैवाने जनता तसे करू शकत नाही आणि आजोबांचे उत्तर शिक्षकांना देऊ शकत नाही.
गोलमाल भाषा की नवे धोरण?
दावोस येथील आपल्या भाषणात नव्या अर्थव्यवस्थेविषयी बोलताना पंतप्रधानांनी असाच गोलमाल सूर लावला आहे. समोर बसलेल्या जगातील हजारएक मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांना उद्देशून राव साहेब म्हणाले, "नियोजनाची अर्थव्यवस्था आम्ही टाकून दिली म्हणजे काही बाजाराची व्यवस्था पूर्णतः स्वीकारली असे नाही. जो बदल घडतो आहे त्याची नोंद आम्ही हिंदुस्थानात घेतली आहे, पण आम्ही संतुलन राखणार आहोत. याला आम्ही मध्यममार्ग म्हणतो."