पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पाटी पुसली, आता पुढे


 ३० डिसेंबर १९९३ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. मधुकरराव चौधरी यांनी एक पत्र सभागृहात वाचून दाखवले. पत्रावर सर्वश्री मोरेश्वर टेमुर्डे, वसंतराव बोंडे, वामनराव चटप, शिवराज तोंडचिरकर व सौ. सरोज काशीकर या पाच आमदारांच्या सह्या होत्या. १९९० च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे हे पाच पाईक जनता दलाच्या चिन्हावर निवडून आले होते. तेव्हापासून आतापर्यंत जनता दलाची शिस्त त्यांनी कसोशीने पाळली होती. अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये या पाच आमदारांनी जनता दल विधानसभा पक्षापासून फारकत घेऊन सभागृहात स्वतंत्र गट म्हणून बसण्याचा आपला निर्णय जाहीर केला.
 सभागृहात जनता दलाचे एकूण सदस्य चौदा, त्यांपैकी पाच जणांनी म्हणजे एक तृतीयांशापेक्षा जास्त सदस्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे कायदेशीर अडचण काहीच नव्हती. अध्यक्षांनी शेतकरी संघटनेच्या आमदारांची ही विनंती मान्य केल्याचे लगेच जाहीर केले. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील राजकीय आघाडीच्या एका कालखंडावर पडदा पडला.

 महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन आता सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांपासून दूर झाले आहे. काँग्रेस, भा. ज. प., शिवसेना आणि इतर चिल्लर पक्ष यांच्याशी संघटनेची जवळीक कधीच नव्हती. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने १९९० मध्ये ज्या ज्या मतदारसंघात शिवसेना-भा. ज. प. विरुद्ध काँग्रेस असा सरळ सरळ सामना होता, त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला सिद्धांततः पाठिंबा संघटनेने जाहीर केला होता, एवढे सोडल्यास काँग्रेसबद्दल संघटनेने सहानुभूती अशी कधी दाखवलीच नव्हती. जातीयवादी पक्षांना सभ्य समाजात काही स्थानच असता कामा नये अशी संघटनेची भूमिका सतत राहिल्यामुळे शिवसेना आणि भा. ज. प. यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही.

पोशिंद्यांची लोकशाही / ३९