पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागा काँग्रेसला मिळतील अशी काँग्रेसचीही अपेक्षा नव्हती, त्यांचे नेतेसुद्धा तसे म्हणत नव्हते.
 या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या मनात समाजकारणातील एक सैद्धांतिक प्रश्न उभा राहतो. या निवडणुकीत इतके पक्ष आहेत, इतक्या आघाड्या आहेत; उन्हाळ्याचे दिवस आहेत; पण या पक्षांकडे किंवा आघाड्यांकडे त्यांचे म्हणणे काय आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता कार्यकर्त्यांची जी फळी उभी राहायला पाहिजे, ती उभीसुद्धा राहत नाही. अशा काळामध्ये उन्हाळ्याच्या कारणाने शहरातील विशेषतः तरुण मंडळी मतदानाला जाण्याऐवजी कुठेतरी सहलीला गेली, वनभोजनाला गेली; त्यामुळे मतदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी झाले.
 इतका सगळा अपूर्व प्रकार असताना, जे निवडणुकांचे निकाल लागले, त्यांचा अर्थ कसा काढायचा? लोकांना आता वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळ्या आघाड्या यांचा कंटाळा आला आहे आणि त्यांनी सर्वांनी एका पक्षाला - त्यातल्या त्यात ज्याला काही इतिहास आहे, ज्याला काही मान्यता प्राप्त आहे अशा पक्षाला निदान आघाडी करून, मजबूत सरकार बनवता यावे आणि ज्यांच्याकडे सौजन्यशील असे नेतृत्व आहे, फार उर्मटपणे बोलण्याची भाषा नाही अशा लोकांवर हिंदुस्थानातील लोकांनी विश्वास दाखवला. अशी एक मांडणी केली जाते.
 या मांडणीमुळे एक प्रश्न तयार होतो. स्वतंत्र भारत पक्षाच्या विचारसरणीमध्ये 'बाजारपेठ का काम करते?' याचे जे विश्लेषण केले आहे, त्यात विचार करण्याची शक्ती व्यक्तीला दिलेली असते, गटाला नव्हे, असा एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी एकदम सामुदायिकरीत्या शहाणपणाचा निर्णय घेतला, हे संख्याशास्त्रीयदृष्ट्या शक्य झालेले दिसते आहे. पण, सगळ्यांनी ठरवून, असा निर्णय घेतला असे म्हणण्यापेक्षा हा निकाल लागल्यानंतर त्यातून जो काही सोईस्कर अर्थ दिसतो आहे, तोच फक्त पुढे मांडून, 'मतदारांनी फार चांगला निर्णय घेतला,' असे म्हणण्याची प्रवृत्ती यातून दिसते आहे.
 आपल्याकडेच मतदान झाल्यानंतर, मी काही दिवस 'जागतिक कृषी मंच'च्या (World Agriculture Forum) काँग्रेसच्या निमित्ताने अमेरिकेत दहा-पंधरा दिवस राहून आलो. तिथेही नुकतेच एक निवडणूक होऊन गेली होती आणि ओबामा तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. निवडून आल्यावर त्यांनी

पोशिंद्यांची लोकशाही / ३४५