पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुंडांचे प्रमाण अभ्यासले तर या प्रश्नाची भयानकता लक्षात येते.
 जागतिक पातळीवर मादक पदार्थांची तस्करी हा दारिद्र्यनिर्मूलनाच्या खालोखाल किफायतशीर व्यवसाय झाला आहे. अफगाणिस्तान, ब्रह्मदेश व नेपाळ यांतील मादक द्रव्यांची वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या प्रमुख मार्गावर भारत आहे. या तस्करांना शासकीय व्यवस्था निष्प्रभ करून स्वतःची अनिर्बंध यंत्रणा उभी करणे आवश्यक असते. या तस्करांनी यासाठी अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. देशविदेशांचे बहुतेक महाराज, महंत आणि बाबा यांचे मठ हे यांचेच अड्डे आहेत. खलिस्तानची चळवळ, ईशान्य भारतातील आतंकवादी हेही मादक द्रव्यांच्या तस्करांचेच हस्तक आहेत.
 सर्व आतंकवादामागील खरी शक्ती मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार हीच आहे. असल्या कामात प्रतिष्ठित सुशिक्षित भद्र लोक फारसे सामील होत नाहीत. याउलट, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि जुनाट सनातनी आत्यंतिक धर्मकल्पना बाळगणाऱ्या समाजातील तरुणांना अशा कारवायांचे मोठे आकर्षण असते.
 पकडल्या गेलेल्या आतंकवाद्यांपैकी मोठे प्रमाण कोण्या एका विशेष धर्माच्या अनुयायांचे सापडले तर त्यावरून आतंकवादाला धार्मिकतेचे लेबल चिकटवणे चुकीचे होईल. आर्थिक मागसलेपण, आत्यंतिक श्रद्धेमुळे आलेले कडवेपण आणि लोकशाही व सभ्य समाज यांचा तिरस्कार हे सर्व आतंकवाद्यांचे समान गुण आहेत. राजकीय सत्ताच आता गुंडांच्या हाती गेल्यामुळे गुंडांचे पारिपत्य होण्याची काही शक्यताच उरलेली नाही. सर्वच शासनकर्ते आतंकवाद्यांपुढे कच खातात आणि आपल्या भेकडपणाचे समर्थन करण्यासाठी मानवतेचा किंवा भाई-भाईवादाचा उपयोग करतात.
 आतंकवादी प्रस्थापित शासनाविरुद्ध हत्यार घेऊन उठतात, त्या क्षणी ते आपल्या मानवी हक्काच्या अधिकारावर पाणी सोडतात. आतंकवाद्यांना फार फार तर आंतरराष्ट्रीय जिनिव्हा कराराप्रमाणे युद्धकैदी म्हणून वागणूक मिळावी यापलीकडे कोणत्याही मागणीचा हक्क उरत नाही.
 २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर माझ्याकडे हजारो पत्रे आली त्या सर्वांचा धोशा एकच – 'पाकिस्तानला मुंहतोड जवाब द्या, पाकिस्तानशी युद्ध पुकारा.' पाकिस्तानशी युद्ध जिंकण्यास भारतीय लष्कर समर्थ आहे, हे गेल्या साठ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. पण, पोखरणोत्तर काळात हा निर्णय इतका सोपा नाही. त्याहीपेक्षा, जागतिक दबाव आणून, पाकिस्तानला भारताशी मुक्त व्यापाराचा करार करायला भाग पाडणे हे अधिक प्रभावी साधन आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / ३२८