पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


होतकरू नव्हे, खचलेल्या मनांचा कौल
(म. रा. विधानसभा २००४ निकाल)


 हाराष्ट्र विधानसभा २००४ च्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. या निकालांचा नेमका अर्थ काय काढायचा, ते ठरवण्यासाठी सखोल विश्लेषण आणि व्यापक चर्चा यांची गरज आहे; ते यथावकाश होईल. निकाल जाहीर होत असताना माझ्या स्वतःच्या मनात ज्या प्रतिक्रिया प्रामुख्याने उमटल्या तेवढ्याच फक्त ताबडतोब नोंदवत आहे.
 या निवडणुकीच्या प्रचारात मी स्वतंत्र भारत पक्षाच्या सातही उमेदवारांसाठी दहा सभा घेतल्या. त्याखेरीज, भाजपच्या उमेदवारांसाठी एक आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी दोन सभा घेतल्या. या सर्व सभांमध्ये मी, प्रामुख्याने तीन मुद्दे मांडले, ते असे :
 १) मतदानाच्या हक्काचा वापर गांभीर्याने आणि सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून झाला पाहिजे. घटनेतील तरतुदींप्रमाणे लहानथोर, अमीरगरीब सर्वांना सारखाच म्हणजे एकाच मताचा अधिकार आहे आणि तो गुप्तपणे बजावू शकण्याचीही खात्री आहे.
 २) लोकसभा २००४ च्या निवडणुकीत, हिंदुत्व आणि स्वदेशीवाद कह्यात ठेवून, खुल्या व्यवस्थेचा धीरगतीने पाठपुरावा करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव झाला. त्या जागी
  घराणेशाही शिरोधार्य मानणारी, देशावर समाजवाद लादणारी आणि ५० वर्षे सतत शेतकरीविरोधी धोरणे राबविणारी काँग्रेस आणि-
  खुल्या व्यवस्थेला विरोध करणारी, नक्सलवाद्यांच्या घातपाती कृत्यांना पाठीशी घालणारी आणि नोकरदारांच्या हिताच्या कार्यक्रमांचा पुरस्कार करणारी डावी आघाडी, तसेच,
  भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि यादव-मुस्लिम जातीयवादाच्या आधारावर

पोशिंद्यांची लोकशाही / २८८