पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचे सगळे हिशेब पुरे झाल्यावर ते आपल्याला बोलावणार.
 वाटाघाटी होणार किंवा नाही हे अजून अनिश्चित आहे. जागा आठ मागायच्या, का दहा, का बारा; जागा कोणत्या मागायच्या? हे काम आपले राजकीय तज्ज्ञ वामनराव उत्तम प्रकारे करतील याबद्दल मला विश्वास आहे. शेतकऱ्यांची आंदोलनाची ताकद किती आहे, हे लक्षात घेऊन आपण आंदोलन चालू ठेवतो किंवा थांबवतो त्याप्रमाणे आपली राजकीय ताकद किती, कुठे, कशी आहे हे लक्षात घेऊन, वामनराव या जागा निश्चित करतील, याबद्दलही मला विश्वास वाटतो; पण चर्चेमध्ये जर असे दिसले, की ही मैत्री काही फारशी सुखकर होण्याची शक्यता नाही, सन्मानपूर्वक होण्याची शक्यता नाही, तर आपल्याला जास्तीत जास्त जागा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागेल.
 बैठकीच्या शेवटी आपला निष्कर्ष असा निघतो :
 स्वतंत्र भारत पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा घेतलेला निर्णय या घडीला उलटविण्याची आवश्यकता नाही. युती टिकविण्याची आमची इच्छा आहे. त्यासंबंधी जी बोलणी चालू आहेत आणि चालणार आहेत, त्याचे संपूर्ण अधिकार आताच्याच राजकीय निर्णय समितीला देण्यात यावे आणि जर का सन्मानपूर्वक बोलणी होणार नसतील, तर आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची तयारी ठेवावी. बोलणी करण्याचे काम असो का वेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे काम असो, या दोन्ही कामांची संपूर्ण जबाबदारी मी ॲड. वामनराव चटपांवर सोपवीत आहे. त्यांनी त्यांना आवश्यकता वाटल्यास राजकीय निर्णय समितीच्या इतर सदस्यांचा सल्ला घ्यावा. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात होणार आहे, हे लक्षात घेता युतीबरोबरच्या बोलण्यांसाठी साधारणपणे १३ सप्टेंबर हा दिवस अखेरचा धरावा. इंग्रजीत एक म्हण आहे की, 'परमेश्वरावर विश्वास जरूर असू दे; पण बंदुकीतली दारूही भिजू देऊ नकोस,' त्याप्रमाणे आपण ज्या काही पन्नासेक मतदारसंघांत निवडणुका लढवू शकू, तेथील तयारीला अंतिम स्वरूप देण्याच्या कामाला लागावे.

(१३ सप्टेंबर २००४)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / २८७