पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





निवडणूक धोरणाचा निर्णय
लॉटरी तिकीट घेण्यासारखा होत नाही


 र्धा कार्यकारिणी - प्रास्ताविक
 शेतकरी संघटना ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवशी माझा खरा जन्म झाला असे म्हटले तर आतापर्यंतची पहिली पंचवीससव्वीस वर्षे शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना शेतीचे अर्थशास्त्र शिकविणे आणि त्यांना सन्मान मिळवून देण्याकरिता लढाईसाठी तयार करण्यात गेली. आजपासून माझ्या आयुष्यातील एक नवा कालखंड, एक नवे युग चालू होत आहे.
 आजच्या या कार्यकारिणीमध्ये देशातील आजच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन, अवलोकन करून शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलन यांच्या पलीकडे जाऊन राजकीय सत्तेच्या दृष्टीने वाटचाल करून राज्यशकट शेतकऱ्यांच्या हाती कसा येईल यावर विचार होणार आहे.
 हा विचार आपण कोणत्या परिस्थितीत करीत आहोत?
 मी ७ जुलै २००४ रोजी राज्यसभेचा सदस्य झालो, या घटनेने शेतकरी संघटनेच्या सर्व पाईकांना आनंद झाला असेल, की आपल्याबरोबर रस्त्यावर बसलेला, तुरुंगात गेलेला, शेतकऱ्यांची दुःखे अचूकपणे जाणणारा, त्यांचे विश्लेषणपूर्वक निदान करणारा एक डॉक्टर शेवटी राज्यसभेत पोहोचला. मलाही असाच आनंद झाला. मलाही असे वाटले, की नाशिकच्या रस्त्यावर बसून, निपाणीच्या रस्त्यावर बसून उसाला भाव मागितला, तंबाखूला भाव मागितला. त्यावेळी वाटायचे की कोण आपला आवाज ऐकेल, हा आवाज दिल्लीपर्यंत कधी जाईल, पंतप्रधान आपल्याला कधी चर्चावाटाघाटींकरिता बोलावतील? अशी वाट पहात आपण दिवसच्या दिवस काढले; कपाशीच्या आंदोलनात वाहून नागपूरला जाताना मुख्यमंत्री आपले म्हणणे ऐकतील का, त्यासाठी ते विमानाने तरी येतील का याची वाट पहात राहिलो. आता राज्यसभेमध्ये

पोशिंद्यांची लोकशाही / २७७