आजचे मराठी वाङ्मय सामाजिकदृष्टया फारसे प्रक्षोभक नाही यावर आपले सर्वांचे एकमत आहे. या पहिल्या नकाराचा अर्थ हे वाङ्मय समाधान आणि तृप्तीने सुखावलेले आहे असा करावयाचा नाही. जे ललित साहित्य मराठीत निर्माण होत आहे,मग ती दिलीप चित्रे यांची कथा असो वा कविता असो, तेंडुलकरांची नाटके असोत, की खानोलकर, उद्धव शेळके, भाऊ पाध्ये यांची कादंबरी असो,- ललित साहित्याचा एक भाग तीव्र असमाधानाने भरलेला आहे. विफलता व कटुतेचाच हा हुंकार आहे. एकीकडे लेखकाच्या मनात असमाधान आहे. दुसरीकडे या वाङ्मयाविषयी या वाङ्मयाच्या चाहत्या वाचकांच्या मनातही थोडेसे असमाधान आहेच. प्रश्न आहे तो असमाधान असण्याचा अगर नसण्याचा नसून जे असमाधान वाङ्मयात अभिव्यक्त होत आहे, त्याचे स्वरूप सामाजिक असमाधानाचे आहे काय, हा आहे. मराठी वाङ्मयात ज्या क्षोभाचे चित्र पडलेले आहे, तो क्षोभ वरिष्ठवर्गीय व्यक्तिवादाशी निगडित असणारा वैयक्तिक असमाधानाचा आविष्कार आहे. हा क्षोभ खोटा आहे असे नाही. तोही अस्वस्थ व विषण्ण करणाराच आहे. पण तो मनाला बंडखोर करणारा नाही. या वाङ्मयात जी बंडखोरी आहे, तिचे स्वरूप वाङ्मयीन संकेतांशी झगडणारे आहे, त्यांना मोडणारे आहे. वाङ्मयीन संकेतांच्या पलीकडे असलेले जे व्यापक जीवन, त्यातील बंडखोरी इथे फारशी नाही. वाङ्मयीन बंड, तेवढाच उद्दाम व बंडखोर आशय नसताना ज्यावेळी सुटे व एकटे अवतीर्ण होते, त्यावेळी त्याचे स्वरूप प्राधान्याने तांत्रिक असणे भाग असते. तसे या बंडखोरीचे स्वरूप आहे. वृत्तांचे प्रयोग करून कवितेत बदल घडविण्याचा प्रयत्न एकेकाळी झाला, तसा अक्षरवटिकेचे स्वरूप बदलून कवितेच्या वाङ्मयीन मूल्यावर परिणाम करण्याचा किंवा गणित मांडून त्यातून कलाकृती सजविण्याचा प्रयोग करावा अशी येथे धडपड दिसत आहे.
भारतासारख्या विकासोन्मुख देशात सामाजिक प्रक्षोभाचे अस्तित्व, नकारात्मक